Wednesday, April 30, 2014

आणि वादळ विसावले....

मेजर जोन माल्कम हा महिदपुरच युद्ध ते मंदसोरच्या तहनंतर बराच काळ मध्य प्रदेशात होता. त्याचे Memoirs of Central India हे १८२३ ला प्रसिद्ध झालेले पुस्तक यशवंतरावांचे अंतिम दिवसांचा वृत्तांत, महिदपुरचे युद्ध ते मंदसोर येथील तहापर्यंतच्या कालावधीतील होळकर घराण्याचा इतिहास सांगते. यशवंतराव, तुळसाबाई, मल्हारराव तिसरे यांच्याबद्दलच्या समजुती-गैरसमजुती या केवळ एकाच पुस्तकाच्या आधारावर भारतीय इतिहासकारांनी बेतलेल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

प्रथमच स्पष्ट करतो कि जोन माल्कम हा पराकोटीचा होळकर द्वेष्टा होता. तो यशवंतरावांना लुटारु-दरोडेखोर व पेंढा-यांचा पुढारी असेच संबोधत राहतो. तो यशवंतरावांनी खंडेराव व काशीरावाचा खुन केला असेही म्हनतो.

खंडेराव व काशीराव हे आपल्याला प्रतिस्पर्धी आहेत या शंकेपोटी त्यांनी त्यांचा खुन केला असे तो म्हणतो. हा आरोप टिकत नाही ते कसे हे आपण वर पाहिलेच आहे. खंडेरावाचा म्रुत्यु झाला तेंव्हा मुळात यशवंतराव माळव्यात नव्हतेच. तरीही येथे आपल्याला १८०६ नंतर कधीही यशवंतरावांना खरोखर वेड लागले होते काय हे आपल्याला तपासुन पहायचे आहे. ज्याला इंग्रज वेड म्हणत होते त्याची लक्षणे तरी काय होती हेही पाहुन घेतले पाहिजे. कारण जो मनुष्य विपरीत स्थितीतही तोफा ओतुन घेत होता, सैन्य वाढवत चालला होता, पेंढा-यांची बंडे मोडत होता, जयपुरच्या राजाला धडा शिकवत होता, प्रजेची कार्ये जशी अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत चालत तशीच न्यायनिष्ठेने चालवत होता त्याला "वेडा" कसे ठरवेले आणि का हे त्याशिवाय समजणार नाही.

तत्पुर्वी माल्कम यशवंतरावांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाबाबत काय म्हणतो हे पाहुयात.

"यशवंतराव हा मध्यम उंचीचा पण अत्यंत बळकट बांध्याचा होता. अपघाताने त्याचा एक डोळा अधु झाला असला तरी त्याचे एकंदरीत व्यक्तिमत्व प्रसन्न होते. अत्यंत दुर्दैवी स्थितीतही त्याचे मनोबल कधी ढळत नसे तर उलट तो आश्वासकच वाटत असे. त्याचे शिक्षण उत्तम झाले असुन मराठी उत्तम तो बोलेच पण हिंदी व पर्शियनवरही त्याचे चांगले प्रभुत्व होते. मराठी तो अत्यंत शुद्ध लिहु शकत होता आणि हिशोब ठेवण्यात त्याचा हात कोणी धरु शकत नव्हता. घोडेस्वारी, तलवारबाजीत तो उत्क्रुष्ठ होता पण भालाफेकीत तर त्याच्याइतक्या अव्वल दर्जाचा कोणीच नव्हता. त्याच्या कौशल्याइतकेच श्रेष्ठ असे त्याचे साहस होते आणि त्याने त्याचे दर्शन असंख्य वेळा घडवले आहे. पुण्याच्या युद्धात केवळ त्याच्या धाडसामुळे त्याचे सैन्य विनाशापासुन वाचले. शिंद्यांच्या तोफा आग ओकत असता तो तोफखाना थंडावण्यासाठी एकटा त्यांच्यावर चालुन गेला...त्याचा घोडा मेला तर त्याने पायउतार होवुन धुमश्चक्रीत स्वत: घुसुन कापाकापी करत, शिंदेंच्या तोपचींना कंठस्नान घालुन तोफांचा त्याच्या सैन्यावर होणारा मारा थांबवला." एवढे लिहुन नंतर माल्कम यशवंतराव हे कसे लुटारुंचे अधिपती, आणि सत्ताभिलाषी होते हेही लिहितो. हा भाग त्याच्या रोषाचा पदसाद आहे हे समजावुन घेत पुढे जावुयात. माल्कम पुढे म्हनतो-

"तोफा ओतायचे काम वेगात चालु होते. २०० लहान-मोठ्या तोफा ओतुन झाल्यावर अजुन दोनशे तोफा ओतायचे काम त्याने हाती घेतले. हळुहळु यशवंतराव शिघ्रकोपी होवू लागला होता. बालाराम शेट या त्याच्या मंत्र्याला तो म्हणे, मला थोड्या वेळापुर्वीचे आठवेना झाले आहे...मला औषध आणुन दे. त्याचे डोकेही प्रचंड दुखत असे....त्याच्या संतापाला तोंड देण्याची कोणात हिम्मत उरलेली नव्हती....यशवंतरावाला वेड लागले होते..."

हे झाले माल्कमचे म्हणने. अलीकडे अनेक इतिहाससंशोधकांनी संशोधन करुन यशवंतरावांचा म्रुत्यु ब्रेन ट्युमरमुळे झाला हे सिद्ध केले आहे. पण माल्कमच्या मताचा पगडा आमच्या मराठी इतिहासकारांवर अधिक असल्याने माल्कमचे मत स्पष्टपणे खोडुन काढने आवश्यक आहे.

१. आधीच स्पष्ट केल्याप्रमाने ३ फेब्रुवारी १८०६ ला यशवंतराव पंजाबमद्धे होते व इंग्रजांशी वाटाघाटी करत होते. ते त्यावेळीस वेड लागलेल्या स्थितीत असु शकत नाहीत. खंडेराव त्यावेळीस मालव्यात असल्याने ते खंडेरावांचा खुन करणेही शक्य नाही आणि त्यासाठी कसलेही कारण नव्हते. वाटेतुनच त्यांनी १५ फेब्रुवारी १८०६ रोजी व्यंकोजी भोसले यांना पाठवले. हे पत्र मागे दिलेले आहेच. हे पत्र यशवंतरावांनी सतलज व व्यासगंगा नदीच्या दोआबातुन पाठवले आहे. या पत्रातील भाषा उदासवानी असली तरी आपले पुढील इरादे त्यांनी त्या पत्रात स्पष्ट केलेले आहेत.

२. काशीरावाचा म्रुत्यु १८०८ मद्धे बिजागढ येथे झाला. खंडेरावाला 
१८०६ सालीच समजा मारलेच असते तर मग पुढे काशीरावाच्या खुनासाठी इतकी वर्ष थांबायचे एकही संयुक्तिक कारण नव्हते. यशवंतराव सार्वभौम महाराजे होते. काशीरावाचा कोणताही हक्क होळकरी राज्यावर उरलेला नव्हता. काशीराव हा त्यांचा कधीही प्रतिस्पर्धीही नव्हता. त्याने यशवंतरावांविरुद्ध कसली आगळीकही केलेली नव्हती. यशवंतराव रणमैदानात शत्रुला ठार मारत...खुनादि कारस्थाने करणे हे मुळात यशवंतरावांच्या सर्वच स्वभावाशी विसंगत आहे. काशीराव हा मुळात दुर्बळ आणि लकवा मारल्याने अशक्त असा माणुस होता.

३. सैन्याची उभारणी व प्रशिक्षण, तोफांची निर्मिती १८०९ पर्यंत सातत्याने सुरुच होती.

४. इतिहासकार जसवंतलाल मेहता आपल्या "Advanced study in the history of modern India 1707-1813" या ग्रंथात पुराव्यासहित सिद्ध करतात कि यशवंतरावांनी दोघांची हत्या केली होती वा त्यांना वेड लागले होते याचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही.

५. मृत्युआधीच काही दिवस यशवंतरावांनी जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी जाण्याची तयारी केली होती. ही बातमी बाजीरावाला कळताच घाबरुन त्याने पुणे सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण यशवंतरावांचे निधन झाल्याचे समजताच त्याला हायसे वाटले. आता यशवंतरावांना वेड लागले आहे अशी काही वस्तुस्थिती असती तर जेजुरी प्रवासाची तयारी त्यांनी केली नसती व पेशवाही घाबरला नसता. एवतेव यशवंतरावांना बदनाम करण्यासाठी दोघांच्या मृत्युचा वापर केला गेला. माल्कमने स्वत: पुढे गफुरखानाला विकत घेवून महाराणी तुळसाबाईंचा खुन केला व त्यांच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत. स्वता: खुनी असलेल्या माल्कमला सर्वच खुनी वाटणार हे उघड आहे.
परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे ती ही कि १८०९ च्या आसपास यशवंतरावांना डोकेदुखी व स्म्रुतीभ्रंशाचा त्रास होवु लागला होता. १७९७ ते १८०९ पर्यंत त्यांनी अविश्रांत कष्ट उपसले होते, असंख्य ताणतणाव पचवले होते. स्वत: तोफा ओतत असल्याने धातुरसाच्या वाफांचाही त्रास त्यांना झाल्याने त्याची परिणती प्रक्रुतीवर होणे स्वाभाविक होते.

माल्कमने त्यांच्या आजारपणाचे जे वर्णन केले आहे ते पाहता आणि तत्कालीन स्थितीत मेंदुविज्ञान शास्त्र जवळपास आस्तित्वात नव्हतेच हे लक्षात घेता त्यांच्या आजाराचे निदान माल्कमने जी लक्षणे वर्णन केली आहेत त्यावरुन लावावे लागते.

मेंदुत गाठ (Cyst) झाल्यानंतर डोकेदुखी, स्म्रुतीभ्रंश ते शरीरात अधुनमधुन आकड्या येणे अशी लक्षणे दिसतात. आता शल्यक्रिया करुन अशी गाठ काढता येत असली तरी शल्यक्रियेतील यशाचे प्रमाण आजही ७० ते ८०% एवढेच आहे. तेंव्हा तर हे विज्ञान अस्तित्वातच नव्हते. माल्कमने त्या लक्षणांना वेडाचे लक्षण मानले, तसे नोंदवुन ठेवले आणि तेच ब्रह्मवाक्य मानले गेले हे अजुन एक यशवंतरावांचे दुर्दैव.

अशी गाठ काढली नाही तर ती वाढत जाते आणि त्याची परिणती ब्रेन स्ट्रोक...म्हणजे म्रुत्युत होते.
आणि तसेच झाले.

२८ आक्टोबर १८११ साली भानपुरा येथे यशवंतराव नावाचे इंग्रज व अन्य शत्रुंसाठीचे प्रलयंकारी आणि भारतभुमीच्या मुक्ततेसाठी क्षितिजे व्यापुन उरलेले वादळ विझले...विसावले...वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी!

कलकत्त्यावरील स्वारी राहुनच गेली.

"हिंदवाणा हलको हुवा
तुरका रहयो न तत
अग्र अंगरेजा उछल कियौ
जोखाकियौ जसवंत..."
(हिंदुस्तानचा एकमेव रक्षक आता राहिला नाही. हिंदु समाजाचे बळ तुटले आहे. मुस्लिम बादशहाचे बळ तर पुर्वीच तुटले होते. यशवंतरावांच्या देहांतामुळे इंग्रज बेहद्द खुष झाले आहेत.) असे कवि चैन सांदुने यशवंतरावांच्या म्रुत्युनंतर लिहिले, यावरुन उत्तर भारतात या पहिल्या स्वातंत्रयोद्ध्याचा केवढा सन्मान आहे याची मराठी वाचकांना कल्पना यावी!

या देशाच्या महान परंपरांचा.....

संवेदनशीलता पराकोटीची हरवत चालली आहे. प्रेमांतून माणुसकीचे, कुसूमकोमल भावनांचे मळे फुलायचे तेथे प्रेमिकांनाच ठार मारले जात विषाक्त भावनांना खत घातले जात आहे. मी "उच्च...मी उच्च" असा जयघोष करणारे महानीच लोक ज्या समाजाने प्रसवलेत त्या समाजाला याची जराशीही शरम वाटत नाही याचीच शरम अधिक वाटते.

जागतिकीकरणानंतर, माहितीचे विस्फोट अधिक व्हायला लागल्यानंतर, जग हे खेडे झाले असे म्हणत, आम्ही होतो तेही खेडे आम्हीच घालवले. आधी गांव जरा बरे होते. माणुसकीची सावली होते. शहरेही खेडूतपणाला आपल्या शुचिर्भुततेत जपत होते. कोणाच्या घरचा पोरगा कोणाच्या घरात जेवून आला याची पर्वा कोणी करत नव्हते. कोणाच्या पोराचे कोणाच्या पोरीशी "झांगडू" चालू आहे याच्या दबक्या चर्चा असल्या तरी कोणाचा जीव घ्यावा ही अवदसा कोणाला आठवत नव्हती. कधीमधी थोड्याफार मारामा-या होत...पण पुन्हा गांवाची लय मूळ स्थितीत यायची. पार गांवच्या पाटलाच्या पोरींवरही आम्ही लाईन मारत असू, त्यांच्या सौदर्याच्या चर्चा करत असू, कधी प्रेमप्रकरणही व्हायचे,  पण डोक्यात दगड घालायला यावे अशी हिंस्त्रता पाटलातच काय...कोणातच नव्हती. जात एवढी महत्वाची मला तरी माझ्या २० वर्षांच्या गांवाकडील जीवनात कधी साधे जाणवलेही नाही.

जात नांवाचा एक प्रकार असतो आणि त्यावरून तुमचे सामाजिक स्थान ठरते याचा साक्षात्कार मी पुण्यात आल्यानंतर झाला. मी अवाक झालो. जाती-पातींचे ताणेबाणे काय असतात आणि तुमची लायकी काहीही असो ती ठरवण्याचे मापदंड केवळ जातीधारितच असतात याचे भान मला पुण्याने दिले.

खेड्यांची नक्कल शहरांनी दुर्दैवाने केली नाही...महान दुर्दैव म्हणजे शहरांची नक्कल खेड्यांनी केली. येथेच सारे फसले. गांवचा सौहार्दपूर्ण जीवनाच्या आत्म्याचा मुडदा तेथेच पडला. शहरी लोक "आम्ही कोठे जात=पात पाळतो?" म्हणत गांवातून शिकायला येणा-या पोरांना त्यांची व आपली जातच दाखवत राहिले. ते गांवाकडे गेले को आवर्जून जातीपातीच्या फालतू चवकशा करायला लागले. जातीय अहंकार तेही वाढवत गेले.

शहरांत जातीमुळे सांस्कृतिक मुडदे पडतात...
गावांत जातीमुळे शब्दश: मुडदे पाडले जातात...

एकूणात सारेच मुडदेफरास झालेत...

"या देशाच्या महान परंपरांचा पाईक असल्याचा मला अभिमान वाटतो!"  

द टेंपेस्ट

आत आणि बाहेर 
घोंगावतेय वादळ
टाकण्यासाठी उखडून 
मुळांनाही
मनाच्या खिडक्या
झाल्यात मूकबधीर
लढण्याची अस्त्रेही
सैरभैर!

(द टेंपेस्ट...माझे एक चित्र)




Tuesday, April 29, 2014

स्वातंत्र्य सर्वोपरी!

इंग्रजांशी शांततेचा तह झाल्यानंतर यशवंतरावांना खरे तर आनंद व्हायला हवा होता. इंग्रजांशी युद्धबंदी करण्याच्या बदल्यात त्यांना अन्य कोणाही संस्थानिकाला न मिळालेली सार्वभौमता मिळाली होती. पण ते अंतर्यामी अस्वस्थ होते. इंग्रजांचे पाऊल या भुमीतून पुर्णत: उखडून फेकता आले नाही...कोणीही साथ दिली नाही याची खंत होती. पुढेही आपल्याला हा लढा एकाकीच लढावा लागणार आहे याची बहुदा त्यांना पुर्णत: जाण आली असावी.

सतलज व व्यासगंगेच्या दोआबातून १५ फेब्रुवारी १८०६ रोजी व्यंकोजी भोसलेंना त्यांनी एक पत्र पाठवले. त्यातील उपहास, वेदना आणि खंत अंगावर येतात. ते मुळातुनच येथे देतो...

"राजश्री व्यंकोजी भोसले सेनाधुरंदर गोसावी यांस सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य, स्नेही यशवंतराव होळकर रामराम उपरी.

स्वराज्यात जलचरांचा प्रसार विशेष झाला. हा घडून येण्यास्तव, महाल मुलकाची आशा न ठेवती कळेल त्याप्रमाणे फौज व कंपू वाढवून, करोडो रुप्यांचे पेचात येऊन, आज दोन-अडीच वर्ष होत आली, रात्रंदिवस इंग्रजांसी मुकाबल्याचा प्रसंग घडत आला. दरम्यान राजश्री दौलतराव सिंदे यांची मेळ करून भेट घेतली. त्यांचे आपले एक विचाराने पगडीवाले सामील राहतीलच, याभावे आपल्याकडे पत्रांच्या रवानग्या होत गेल्या. मेवाडप्रांती आलियावर ताम्रांस चोहोकडून पायबंद देऊन हारीस आणावे यास्तव पंजाबापावेतो यावयाचे केले. इकडे लाहुरवाले वगैरे शीखांच्या भेटी होऊन सर्व सामल झाले. पोख्त जमाव झाल्यामुळे फिरंगी मागे पंचवीस तीस कोसांचे अंतराने येत गेले. त्यांनी पट्यालाचे मुक्कामापासून समेटाचे बोलणे लाविले. इकडील तयारी पाहून सोबत्यांनी राजेरजवाडे अनुकूल करुन दिल्लीचे सुमारे येऊन शह द्यावा, ते न करता, कारभारी दुराशेत येऊन पुन्हा त्याची एकोपा ठेऊन मेवाडात राहिले.

पूर्वी स्वराज्यात ऐक्यता बहूत. येणे करोन आज पावेतो व्यंग न पडता एकछत्री अंमल फैलावला होता. हल्लीच्या आपसांतील चाली पाहून सर्वास आपले घर रक्षण करून जमीनदारीने असावे हे प्राप्त झाले. आपले येण्याची प्रतीक्षा होतीच. तो योग न आला. फौज सामल होईल हे कागदोपत्री श्रवण मात्र झाले; अथवा तिकडेच बंगाल्यात वगैरे बल धाडले असते तरी किती उपयोग घडता!

हिंदू धर्मास मुख्य आपले इरादे नमूद असावे ते काही दिसण्यात येईना. स्वधर्मास एक आमचा नफा, वरकडांची नुकसानी असाही अर्थ नाही. सर्वत्रांची उमेद, अनुभव व प्रत्यय पाहून अंग्रेजांकडून समेटाचे बोलणे झाले होते, त्यावरून समेट करुन घेतला. फिरंगी कूच करून माघारे दिल्लीप्रांती गेले. आमचे मुक्काम व्यासगंगा व सतलज नदीचे द्वाबात आहे. इत:पर दरकूच माळवा प्रांती यावयाचे घडेल. वरकड घरोब्याचे विचार सनातन आहेत. ते यथाक्रम चालवावे. इकडील दुसरा अर्थ मानू नये. बहुत काय लिहिणे. लोभ कीजे हे विनंती. मोर्तब."

पत्र पुरेसे बोलके असल्याने त्यावर मी अधिक भाष्य करत नाही. सारा देश सूप्त असतांना एक मनुष्य एकाकीपणे झुंजत होता, त्याला ताम्र-जलचर (इंग्रज) या भुमीवर नको होते. त्याचा लढा संपला नव्हता. माळव्यात परत येताच त्यांनी सर्वप्रथम आपली राजधानी भानपुरा या आताच्या मंदसोर जिल्ह्यातील शहरात हलवली. इंग्रज आता आपल्याला तोफा देणार नाहीत याची खात्री पटल्याने तेथे त्यांनी तोफा ओतण्याचा मोठा कारखाना काढला. घरभेदी अमिर खान वरकरणी तरी त्यांच्यासोबतच होता. मैत्र स्मरून त्याला त्यांनी टोंकची जागीर कायम केली आणि तिकडेच ठेवले. आपले मनसुबे त्यांना आता त्याच्याशी वाटायचे नव्हते. या सा-या प्रदिर्घ युद्धात यशवंतरावांची सैन्यशक्तीही कमी झालेली होती. खत्री व अमिरखानाबरोबर सैन्याचे विभाजनही झालेले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर सैन्यभरती सुरु केली. जुन्या बटालियन्स मोडुन नवी रचना सुरु केली. युरोपियन युद्धतंत्रावर त्यांची हुकुमत होतीच. त्यांनी आपल्या दोन अवाढव्य पलटनींची पुनर्रचना करत मोठ्या-मध्यम व छोट्या आकारात विभाजन केले केले. देशभरातुन उत्तमोत्तम घोडे खरेदीचा सपाटा लावला. त्यांची कन्या भिमाबाई होळकर उत्कृष्ठ अश्वपरिक्षक असल्याने हे कार्य तिच्यावर सोपवले गेले. नवीन सैन्याला कठोर प्रशिक्षण दिले जावु लागले. एक लक्ष प्रशिक्षित सैन्य उभारण्याच्या दिशेने त्यांनी वेगाने वाटचाल सुरु केली. कारखान्यात रात्रंदिवस तोफा ओतायचे काम सुरु होते. मेजर माल्कम हा यशवंतरावांचा कडवा विरोधक, पण तो म्हणतो, स्वत: यशवंतराव अनेकदा फाउंड्रीत तोफा ओतायचे काम करत असत. द्धेयाशी एवढी निष्ठा कोणातही आढळुन येणार नाही. आपल्या राज्यात आल्या आल्या, खरे तर एवढी दोन-अडिच वर्षांची दौड, सततची जीवघॆणी युद्धे, जीवावरची संकटे यातुन निघालेल्या कोणत्याही माणसाने शांततेचा उपयोग काही काळ तरी विश्रांतीसाठी केला असता...पण यशवंतराव खरच अजब रसायन होते. येताच ते कामाला भिडले होते.

या मागे त्यांचे कारण होते...योजना होती.

हे लाखाचे सैन्य आणि दोनशे मोठ्या तोफा त्यांना हव्या होत्या...

कारण त्यांनी स्वत:च सरळ कलकत्त्यावर आक्रमणाची योजना आखली होती. ज्याबद्दल ते भोसलेंना सांगुन थकले होते ते कार्य आता ते स्वत:च करणार होते. त्यांना भारतात इंग्रज नको होता. देशाचे स्वातंत्र्य सर्वोपरी होते...स्वत:ची विश्रांती नाही! 

Monday, April 28, 2014

रणजित सिंहाची गद्दारी!


जनरल लेकवर अंतिम आणि संपुर्ण विजय मिळवुनही भरतपुरच्या जाट राजाला अवदसा सुचली. त्याने नेमक्या त्याच वेळीस इंग्रजांशी तह केला. यशवंतरावांना जी भिती होती तिच खरी ठरली. युद्धात जिंकता येत नाही...येणार नाही हे लक्षात आलेल्या इंग्रजांनी राजकीय पटावर विजय मिळवला होता. यशवंतरावांच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसण्यात आला होता.

जाटाने तह करुन यशवंतरावांना अडचणीत आणले होते.

इंग्रजांनी हा जाटाला २२ फ़ेब्रुवारीलाच...म्हणजे ज्या दिवशी आपला संपुर्ण पराभव झाला आहे आणि जर जाटाला वश केले नाही तर एक सैनिकही येथुन परत जावु शकणार नाही हे लक्षात आले तेंव्हा त्यांनी रणजितसिंहाशी तात्काळ वाताघाटी केल्या. भीति, आमिषे, आश्वासनांच्या खैराती केल्या. यशवंतराव जरी जिंकला असला तरी तो येथुन जाताच आम्ही भरतपुरचे राज्य उध्वस्त करु अशी भिती त्यांनी दाखवली. आज ना उद्या आम्ही यशवंतरावांना पराजित करणारच, मग भरतपुरचे भविष्य काय होईल याचे चित्र उभे केले. यशवंतरावांना अन्य कोणीही राजा समर्थन देत नाहीय हेही रनजितसिंहाच्या लक्षात आणुन दिले गेले. यशवंतरावांची साथ सोडली तर मात्र इंग्रज त्यांच्याशी मित्रत्वाचा व भरतपुरचे राज्य इंग्रजांच्या रक्षनाखाली ठेवण्याचा करार करायला तयार होते. रणजितसिंह त्यांच्या आमिषांना बळी पडला. त्याने इंग्रजांची साथ द्यायचे ठरवले.

हे कळताच रणजितसिंहाला पकडुन धडा शिकवणे यशवंतरावांना सहज शक्य होते...पण त्याच्या भुमीवर त्याच्याशी असा व्यवहार करणे यशवंतरावांच्या नैतिकतेत बसत नव्हते. त्याने इंग्रजांची बाजु घेतल्याने व त्याने यशवंतरावांना आपल्या भुमीवर युद्ध न करण्याची विनंती केल्याने त्यांनी भरतपुर सोडण्याचा निर्णय घेतला. शिख राजे तरी या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होतील अशी अशा त्यांना वाटत होती, कारण भरतपुरच्या विजयाचा अनुकुल परिणाम शिखांवर झाला होता.

त्यांनी भरतपुर सोडण्याचा निर्र्णय घेतला.

पुढे ईंग्रजांनी १७ एप्रिल १८०५ रोजी रणजितसिंहाशी लेखी करार केला. डीगचा किल्लाही त्याला परत दिला. कागदावर रणजितसिंहाने २० लक्ष रुपयांची खंडनी दिली असे दाखवुन प्रत्यक्षात तीन लाखच घेतले. ही लबाडी होती. इंग्रजांनी त्याची भरतपुर राज्यावरची सार्वभौमता मान्य केली. ही सार्वभौमता किती काळासाठी असेल याचा विचार त्याने केला असता तर? अर्थात इंग्रजांनी नंतर रणजितसिंहांशी केलेला करार पाळला नाही हे ओघाने आलेच.

रणजितसिंहाचे हे क्रुत्य देशद्रोहाचे होते. यशवंतराव आता जिंकला असला तरी तो सतत येथे राहणार नाही, तो दुसरीकडे गेला कि इंग्रज आपला सुड उगवतील ही भिती या तहामागे होती असे इतिहासकार म्हणतात आणि ते खरेही आहे. पण तो तटुन राहिला असता तर इंग्रजांना पुढच्या हालचालींना वाव मिळाला नसता हे त्याच्या लक्षात आले नाही हे देशाचे दुर्दैव आहे.  .

भरतपुरच्या युद्धातील जय हा अद्भुत आहे. वाटर्लुदेखील त्यामानाने सोपे होते असे नंतर या युद्धात सहभागी झालेल्या व पुढे १८१५ मद्धे वाटर्लु युद्धातही लढलेल्या सेनानींनी नमुद करुन ठेवले आहे. खरे तर यशवंतराव अत्यंत प्रतिकुल स्थितीत होते. खत्रीने त्यांचा विश्वासघात करुन त्यांना सोडले होते. अमिरखान इंग्रजांचा हस्तक बनलेला होता. डीगच्या लढाईत त्यांच्या अनेक तोफा शत्रुहाती पडलेल्या होत्या. जनरल लेक सर्व शक्तीनिशी त्यांच्यावर तुटुन पडलेला होता. त्यांच्या होळकरी संस्थानांत कर्नल मरेने धुमाकुळ सुरु केलेला होता. पुरेसे धन नव्हते. कोणी मित्र नव्हता. आणि तरीही त्यांनी लेकलाही धुळ चारली होती.

या युद्धानंतर वेलस्लीला हिंदुस्तानातुन परत बोलावले गेले. खरे तर वेलस्लीचा भारतातुन फ्रेंचांचा अंमल पुरता उठवणे, पेशव्याला मांडलिक करुन व शिंदे-भोसलेंचा सहज पराजय करुन इंग्रजी सत्ता वाढवण्यात मोठा हातभार होता. त्यामुळे वेलस्ली व लेक साम्राज्याचे नायक (Hero) बनले होते. ब्रिटिश जनतेच्या गळ्यातील ताईत बनले होते. पण यशवंतराव होळकरांविरुद्ध मात्र त्या दोघांनाही सतत अपयश आल्याने त्यांची प्रतिमा भंग पावली होती. भरतपुरला पराभव स्विकारावा लागल्यानंतर कंपनी सरकारने तातडीने हालचाली सुरु केल्या. जर मराठा राजमंडळाचे या पराभवानंतर पुनरुज्जीवन झाले तर आपण घोर परिस्थितीत सापडु याची त्यांना जाणीव होती. त्यात तेंव्हा इंग्रज नेपोलियनशी युद्धांत चांगलेच अडकुन पडले होते. त्यात भारतात इंग्रजविरोधी हवा तयार झाली तर जो पेचप्रसंग निर्माण होईल तो सोडवायचा कसा हा प्रश्न होता. वेलस्ली ही स्थिती हाताळु शकत नाही हे स्पष्ट झाले होते.

इंग्रजांनी वेलस्लीला परत इंग्लंडला बोलावुन घेतले आणि लार्ड कार्नवालिसची गवर्नर जनरल म्हणुन ३० जुलै १८०५ ला नियुक्ती केली. पण इंग्रजांच्या दुर्दैवाने कार्नवालिसचा ५ आक्टोबर १८०५ ला गाझीपुर येथे अचानक म्रुत्यु पावला. त्याच्या जागेवर मग सरकारने जोर्ज बार्लो याची नियुक्ती केली.

अशा रितीने यशवंतरावांनी इंग्रज सरकार हादरवुन सोडले होते. त्यांना भारताबाबतची सर्वच धोरणे बदलायला भाग पाडले होते.

भरतपुरहुन निघालेले यशवंतराव मग जिंद, पतियाला येथील राजांना भेटले. अनेक शिख राजा-रजवाड्यांनाही एकत्र लढ्याचे आवाहन केले. भारतात अन्य राजे-नबाब-संस्थानिकांनाही पत्रे पाठवण्याचा उपक्रम सुरुच होता. शिख राजे मानसिंह व लाहोरचे महाराजा रनजित सिंह यांनी त्यांच्या लढ्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. ही सध्या जमेची बाजु होती. सर्वांनी एकत्र येवुन उठाव केल्याखेरीज इंग्रजांचे पुर्ण पारिपत्य होणे शक्य नव्हते. इंग्रज देशभर पसरला होता. काही युद्धे जिंक्ल्याने इंग्रज पळेल असे वाटुन घेण्याएवढे अपरिपक्व नव्हते ते. त्यामुळे त्यांनी आपले प्रयत्न अथकपणे सुरुच ठेवले. लेक अंतर ठेवुन त्यांचा पाठलाग करत राहीला पण एकदाही त्याने यशवंतरावांशी युद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही.

कार्नवालिसने गवर्नर होताच पहिला निर्णय घेतला तो म्हणजे काय वाट्टेल त्या किमतीवर यशवंतरावांशी शांततेचा तह करायचा. त्याखेरीज इंग्रजांना येथे भविष्य नाही याची त्याला पक्की जाणीव होती. यशवंतराव पतियाळाला असतांनाच इंग्रजांचे प्रतिनिधी त्यांच्याकडे शांततेचा तह घेवुन पोहोचले. इंग्रजांना यशवंतरावांशी युद्ध नको होते. होळकरांचे सर्व राज्य स्वतंत्र व सार्वभौम मानायला ते तयार होते. होळकरी राज्यात वा होळकर-शिंदे संघर्षात हस्तक्षेप करणार नाही असे लेखी वचन द्यायला ते तयार होते. एवढेच नव्हे तर एकही इंग्रज होळकरांच्या भुमीवर यशवंतरावांच्या अनुमतीखेरीज पाय ठवणार नाही असेही ते कबुल; करत होते. त्यांना होळकरांकडुन कसलाही युद्धखर्च नको होता. उलट ते यशवंतरावांचा जयपुरवरील चौथाईचा हक्क कबुल करायला तयार होते.

खरे तर असा सन्मानपुर्वक तह तत्कालीन कोनत्याही राज्यकर्त्याने हसत केला असता. अन्य सर्वच राज्यकर्त्यांना मानहानीकारक अटींवर तह करावे लागले होते. इंग्रजांच्या तैनाती फौजा ठेवाव्या लागल्या होत्या. कोणतेही राजकीय धोरण ते इंग्रजांच्या परवानगीखेरीज ठरवु शकत नव्हते. ते गुलाम बनलेले होते. यशवंतराव हे एकमेव महाराजा होते ज्यांच्याशी इंग्रज शांतीचा तह करु इछ्छित होते...मांडलिकत्वाचा नाही.

पण यशवंतरावांना स्वातंत्र्य फक्त स्वत:च्या राज्यापुरते नको होते. त्यांना इंग्रज फक्त स्वत:च्या राज्याबाहेर नव्हे तर देशाबाहेर पाहिजे होता. त्यांनी इंग्रजांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

तेवढ्यात दौलतराव शिंद्यांनीही आता होळकरांना साथ देण्याचा निर्नय घेतला. यशवंतरावांना तसे कलवलेही व सैन्य घेवुन तो यशवंतरावांना सामील व्हायला निघाला. पण इंग्रजांना हे समजताच त्यांनी यशवंतरावांना वाटेतच गाठले. त्याचे मन वळवले. २३ नोव्हेंबर १८०५ रोजी दौलतरावाशी पुन्हा नवा करार करुन त्याला अधिकचा प्रदेश दिला. दौलतरावाचा होळकरांना मदत करण्याचा उत्साह मावळला. यशवंतरावांना त्याने पुन्हा एकदा निराश केले.

यशवंतराव लाहोरला जायला निघाले. तोवर मानसिंगांची फौज त्यांना येवुन मिळालेली होती. जनरल लेक पाठलागावर होताच, पण त्याने कोठेही यशवंतरावांशी युद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही.

लाहोरला यशवंतराव जात आहेत आणि शिख राजे त्यांना मिळु लागले आहेत हे लक्षात येताच इंग्रजांनी पुन्हा त्यांची कुटनीति वापरली. जनरल लेकने महाराजा रणजित सिंहांना तातडीने एक खलिता पाठवला आणि यशवंतरावांना सामील न होण्याची ताकीद दिली. रणजितसिंगांनी आपल्या राज्यातील व शेजारील राज्यातील शिख नेत्यांची बैठक भरवली. फत्तेहसिह अहलुवालिया आणि अन्य प्रमुखांनी रणजित सिंगांना यशवंतरावांना सामील न होण्याचा सल्ला दिला. इंग्रजांनी तोवर बाग सिंग या रणजित सिंगाच्या चुलत्याला रणजितसिंगाकडे पाठवले व त्याचा प्रभाव वापरुन रणजितसिंगाचे मन इंग्रजांच्या बाजुने वळवायला लावले. तोवर ईंग्रजांचे वकीलही लाहोरला पोहोचले आणि त्यांनाही आमिषे दाखवुन शिखांशी नवीन मित्रत्वचा करार करुन घेतला. या करारानुसार मैत्रीच्या बदल्यात त्यांनी यशवंतरावांना कसलेही सहकार्य करायचे नाही असे कबुल करुन घेतले होते. यशवंतरावांना हे कळताच त्यांनी जे संतप्त उद्गार काढले ते आजही पंजाबमद्धे म्हण बनुन बसले आहेत. त्या करारामुळे यशवंतरावांचा अखेरचा मार्गही बंद झाला. मान सिंहानेही आपला विचार बदलला. त्याची सेना आल्या वाटेने निघुन गेली. अवघ्या देशात ते एकाकी पडले. त्यांची स्वातंत्र्याची आस, देशाच्या भवितव्याची कालजी कोणाही शासकाला समजली नाही. यशवंतराव खिन्न होणे स्वाभाविक आहे.
.
तेंव्हा यशवंतराव बियास नदीच्या काठी होते. आता परत आपल्या राज्याकडे परतण्याखेरीज व पुढील नवीन दिशा शोधण्याशिवाय व नवा मार्ग आखण्याखेरीज त्यांच्यासमोर कोणताही मार्ग उरला नव्हता. खरेच सारे मार्ग बंद झाले होते, पण तरीही हताश न होता नवीन मार्ग शोधायची जिद्द त्यांच्यात होती आणि हीच त्यांच्या व्यक्तिमत्वातील खरी शक्ती होती.

यशवंतरावांना एकाकी पाडन्यात इंग्रजांना यश आले होते. पण यशवंतरावांची धास्ती त्यांच्या मनात कायम होती. लेकवर कोणत्याही अटींवर यशवंतरावांशी शांततेचा तह करावा यासाठी दबाव वाढत होता. यशवंतराव युद्धायमान आहेत तोवर आपल्याला शांततेने येथे कारभार करता येणे अशक्य आहे हे त्यांच्या लक्षात आलेले होते. खरे तर कोणीही मित्र वा समर्थक नसलेल्या यशवंतरावांशी युद्ध करुन त्यांना नमवने लेकसारख्या सेनानीला कधीही आवडले असते...

पण त्याने यशवंतरावांचा धसका घेतलेला होता. तो भरतपुरपासुन यशवंतरावांच्या पाठीशीच होता, पण कोठेही त्यांच्याशी युद्धाची हिम्मत केली नव्हती. अम्रुतसरला तर ते एकदा समोरासमोरही आले होते, पण त्याने यशवंतरावांना मार्ग मोकळा करुन दिला होता. यशवंतरावांशी लढायची अजुनही त्याची हिम्मत होत नव्हती.

यशवंतरावांना इंग्रजांचे वकील भेटले. त्यांना यशवंतरावांच्या अटींवर शांततेचा तह करण्याचे अधिकार देण्यात आले होते. आपल्याला भविष्यात लढायचे असेल तर त्यांनाही खरोखर काही काळ सैन्य व शस्त्रास्त्रांची जमवाजमव करण्यासाठी वेळ हवा होता. भारतातुन फ्रेंचांचे आस्तित्व संपल्याने त्यांच्याकडुन तोफा मिलवण्याचा मार्ग बंद झाला होता आणि इंग्रजांनी आता तोफ सोडा एक बंदुकही त्यांना विकली नसती. आपली शस्त्रास्त्रे आपल्यालाच बनवावी लागतील याची त्यांना जाणीव होती. त्यांचे एकुण सैन्यही खत्रीच्या दगाबाजीमुळे कमी झाले होते. अमीरखान आज बरोबर असला तरी नसल्यात जमा होता त्यामुळे त्याचे घोददळ आपले आहे असे ते मानत नव्हते. त्यांना वेळ हवा होता. यशवंतरावांनी इंग्रजांनी दिलेला शांततेच्या तहाचा प्रस्ताव मान्य करण्याचे ठरवले.

यशवंतरावांनी चर्चांच्या अनेक फे-यांत इंग्रजांच्या प्रस्तावापेक्षा अधिक अटी घातल्या. २४ डिसेंबर १८०५ रोजी त्यांच्यात बहुतेक मुद्द्यांवर सहमती झाली, पण यशवंतरावांनी जाचक अटी घातल्याने तो मसुदा गवर्नर जनरल बार्लोकडे अनुमतीसाठी पाठवण्यात आला. त्याने काही दुरुस्त्या सुचवून कराराचा मसुदा ६ जानेवारी १८०६ ला परत पाठवला. यशवंतरावांनीही मग त्यात अधिकच्या दुरुस्त्या सुचवुन शिंदे-होलकरांच्या प्रश्नात इंग्रज लक्ष घालणार नाहीत असेही कबुल करुन घेतले.

या तहानुसार इंग्रजांनी होळकरांना त्यांचे सारे प्रांत परत देवुन त्यावरील त्यांची सार्वभौम सत्ता मान्य केली. जयपुर, उदयपुर, कोटा आणि बुंदीवरील त्यांचा चौथाई वसुलीचा हक्क मान्य केला. होळकरी राज्यांतर्गतच्या कोनत्याही प्रश्नात ईंग्रज लक्ष घालणार नाहीत वा हस्तक्षेप करणार नाहीत हेही मान्य केले. बदल्यात होळकरांनी इंग्रजांशी फक्त युद्धबंदी जाहीर केली. हा करार ६ फेब्रुवारी १८०६ रोजी राजघाट येथे झाला. हे राजघाट म्हनजे आता जेथे महात्मा गांधींची समाधी आहे तेच स्थान होय.

इंग्रजानी स्वता:हुन सामोरे येवुन, सर्व अटी मान्य करुन केलेला हा एकमेव तह. या तहाने होळकरांची सार्वभौमता अखंडित राहिली आणि यशवंतरावांना आपल्या पुढील योजना अंमलात आनण्यासाठी उसंत लाभली.

इंग्रज करार पाळनार नाहीत हे त्यांना चांगलेच माहित होते...

पण ते तरी कोठे करार पाळणार होते?

त्यांच्या डोक्यात पुढील योजना तयार होत्याच.

Sunday, April 27, 2014

भरतपुरचे युद्ध...महायुद्ध!

जनरल लेकने २८ डिसेंबरला, हाती काहीच आले नाही आणि निष्कारण हानी तर झाली हे बघुन, डीग सोडले. या युद्धात होळकरी सैन्याला काहीच फटका बसला नव्हता पण लेकचे मात्र २२७ सैनिक ठार झाले होते. ज्या तोफा हाती आल्या त्या यशवंतरावांनी कर्नल मोन्सनकडुनच जिंकलेल्या होत्या...त्यामुळे गेलेला माल परत आला एवढेच समाधान. यशवंतराव आता भरतपुरच्या किल्ल्यात आहेत आणि भरतपुरच्या जाटाने यशवंतरावांना पाठिंबा दिला आहे ही आता त्याला चिंतेत टाकणारे बाब होती. त्याने मग राजकीय खेळ्याही सुरु केल्या व भरतपुरचा मार्ग धरला. हा यशवंतराव मोन्सनप्रमाणे असाच खेळवत दुरवर नेउन खात्मा तर करणार नाही ना अशीही भिती त्याला होतीच. पण त्याने यावेळीस तसे झाले तरी पर्यायी बटालियन्स ऐन वेळीस मदतीला येतील अशी व्यवस्था करुन ठेवली होती.

२ जानेवारी १८०५ ला तो भरतपुरच्या किल्ल्याबाहेर पोहोचला. सात जानेवारीला लेकने किल्ल्यावर तोफांचा भडिमार सुरु केला. पण किल्ल्याच्या अभेद्य भिंती बुलंद राहिल्या. किल्ल्यावरुन यशवंतरावांचे तोपचीही प्रतिकार करत होते. किल्ल्याजवळ येवुन सुरंग लावायची इंग्रज सैन्यात हिम्मत होत नव्हती एवढा तिखट प्रतिकार होत होता..

सतत भडिमाराने दोन दिवसांनी किल्ल्याच्या एका तटाचा काही भाग कोसळला, पण त्याचा फायदा लेकला मिलण्याच्या आतच होळकरी सैन्याने तो लगोलग बुजवुनही टाकला. यामुळे लेक हतबुद्ध झाला. नऊ जानेवारीला मात्र किल्ल्याला पुन्हा भगदाड पाडण्यात लेकला यश आले. होळकरी लोकांनी ते बुजवायच्या आतच हल्ला करण्याची तयारी लेकने केली. सैन्याच्या दोन तुकड्या त्याने हल्ला करत किल्ल्यात घुसण्यासाठी पाठवल्या. पण येथे मात्र होळकरी सैन्य तटाबाहेर येवुन आवेशाने इंग्रजांवर तुटुन पडले. तटापर्यंतही एकही सैनिक पोहोचु शकला नाही. इंग्रज सैन्य पळु लागले. होळकरी सैन्याने पाठलाग करत पळत्यांची कतल केली. या लढ्यात लेकचे स्द्वेना, क्रोसवेल व मेटल्यंड हे अधिकारी ठार झाले व चारशेपेक्षा अधिक सैनिक ठार झाले. ही इंग्रजांच्या द्रुष्टीने खुपच मोठी हानी होती. होलकरी सैन्यातील फक्त २२ वीर या युद्धात ठार झाले.

हा लेकला खरे तर इशारा होता. पण लेकही आता जिद्दीला पेटला होता...कारण त्याचे संपुर्ण भविष्य या युद्धाच्या निकालावर अवलंबुन होते. यशवंतराव हा भारतातील इंग्रजी साम्राज्याआड आलेला एकमेव काटा होता...आणि त्याचे निखंदन होण्यावरच इंग्रजांचे राज्य निर्माण होणार कि फक्त कलकत्त्यावरुन व्यापार करत बसावे लागणार हे ठरणार होते. त्यामुळे त्याचे सर्वशक्तीनिशी हल्ले सुरुच राहिले. जोवर किल्ल्याची भिंत पडत नाही तोवर लेकला आत घुसता येणे व समोरासमोर युद्ध करता येणे अशक्य होते. किल्ल्यावरुन होणा-या तोफांच्या भडिमारात त्याचे रोज नुकसान होतच होते.

त्यात स्वत: यशवंतराव किल्ल्याबाहेर आपला तळ ठोकुन बसले होते. लेकच्या तळांवर ते अचानक हल्ले चढवुन वेढा उठवण्याची शर्थ करत होते. लेकला आपली छावणी त्यामुळे बदलावी लागली व रक्षणासाठी अधिक तुकड्यांची व्यवस्था करावी लागली.

भरतपुरच्या किल्ल्याभोवती ३०-४० फुट रुंदीचा पाण्याने भरलेला खंदक होता. हा खंदक शिड्या व लाकडी फळ्या टाकुन ओलांडुन किल्ल्याच्या दोन नंबरच्या दारावरच हल्ला करण्याची योजना लेकने आखली. तत्पुर्वी त्याच्या टेहळ्यांनी या द्वारावरील सुरक्षा, होलकरांचे तेथील बळ याचा पुरता अंदाज घेतला होता. हे दार पडले तर आत सर्वशक्तीनिशी घुसुन होळकरांचा पराभव करण्याची त्याची योजना ह्पोती. लेफ्ट. कर्नल मेक्रायकडे या आक्रमणाचे नेत्रुत्व दिले गेले. या दाराकडे शत्रुचे लक्ष जावु नये यासाठी दुस-या बाजुने किल्ल्यावर भडिमार सुरु केला.

कर्नल मेक्रायने खंदक ओलांडायचा प्रयत्न सुरु केला. खंदकावर शिड्या अंथरुन लाकडी फळ्या टाकल्या. तोवर होळकरांकडुन एक गोळीही झाडली गेली नाही. जणु त्या द्वाराच्या रक्षणासाठी कोणी नव्हतेच!

पण होळकरी सैन्याने अशा प्रसंगाला तोंड देण्यासाठी खंदकाच्या वरच्या बाजुला छोट्या बांधात भरपुर पाणी अडवुन ठेवले होते. जसे इंग्रजी सैन्य फळ्यांवरुन खंदक ओलांडायला झेपावले तसे त्यांनी अचानक पाणी सोडले आणि एकाएकी खंदक ओसंडुन वाहु लागला....फळ्या व त्यावरील माणसे त्या लोंढ्यात गटांगळ्या खात वाहुन गेले. एकच अफरातफर माजली. ईंग्रजी सैन्य या अनपेक्षीत प्रकाराने हबकुन गेले. त्यातुन ते सावरतात न सावरतात तोच अचानक बंदुका त्यांच्यावर वर्षायला लागल्या. इंग्रज धदाधड कोसळु लागले. जगले वाचले ते पळत सुटले.

या हल्ल्याच्या नादात इंग्रजांना आपले ५०० सैनिक तर गमवावे लागलेच पण लेफ्ट. कर्नल मेक्राय आणि अन्य दोन अधिकारीही ठार झाले. हा लेकला अजुन एक जबरी फटका होता. यशवंतरावांची युद्धनीति त्याला अजुन समजायची होती. गनीमी कावा कशाला म्हनतात हेही शिकायचे होते.
त्यात आता खुद्द यशवंतराव आपल्या निवडक सैनिकांच्या तुकडीसह किल्ल्याबाहेर पडुन लेकच्या छावण्यांवर हल्ले करु लागले होते हे आपण पाहिलेच. लेकने हा वेढा उठवावा व येथुन निघावे अशी त्यांची योजना होती. यशवंतरावांनी दुरद्रुष्टीने अमिरखानाला बुंदेलखंडात पाठवुन दिले. अमिरखानने तिकडे बुंदेलखंड (आता इंग्रजांच्या अखत्यारीत) पुरता उध्वस्त करुन लुटायला सुरुवात केली. ही सारी लुट त्यालाच मिळणार असल्याने तो उत्साहात होता. आणि यशवंतरावांपासुन घरभेदी दुर गेल्याने आपल्या योजना गुप्त ठेवता येवु लागल्या होत्या.

येथे अमिरखानाबाबत थोडे सांगायला हवे. खत्रीप्रमाणेच अमिरखानानेही इंग्रजांशी हातमिळवणी केलेलीच होती, पण त्याने यशवंतरावांबरोबरच राहुन इंग्रजांना आतुन मदत करावी असा त्यांच्यात करार झाला होता. त्या बदल्यात त्याला टोकची जहागीर कायमस्वरुपी देण्याचे वचन इंग्रजांनी दिलेले होते. थोडक्यात अमिरखान हा दुहेरी भुमिका निभावु लागला होता. यशवंतरावांवर फरुकाबादेत झालेला हल्ला व डीगच्या लढाईत हाती-तोंडी आलेले यश हरपवायला अमिरखानाने मोठा वाटा उचलला होता. सेनापतीच फितुर असेल तर दुसरे काय होणार? अमिरखान हा लालची निघाला. दोन्हीकडुन जे मिळेल ते मिळवायची त्याची नीति होती. यशवंतरावांनी त्याच्या याच स्वभावाचा फायदा घ्यायचे ठरवुन ती ब्याद दुर पाठवली. इंग्रजांना काही सैन्य बुंदेलखंडाच्या रक्षणासाठी पाठवावे लागणार होते व लक्षही विचलीत होणार होते. आणि तसे झालेही.

त्यामुळेच २१ जानेवारी ते २० फ़ेब्रुवारी या प्रदिर्घ काळात लेकने किल्ल्यावर एकही हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला नाही. बुंदेलखंडात त्याला काही सैन्य पाठवावे लागले व पर्यायी बटालियन्स व दारुगोळा येण्याची वाट पाहणे व नव्या योजना आखत बसणे त्याच्या नशीबी आले. यशवंतराव मात्र किल्ल्याबाहेरील आपल्या तळावरुन लेकच्या तळावर छापे घालुन त्याला हैरान करतच होते.

इंग्रजांवर किल्ल्याबाहेर येवुन सर्वशक्तिनिशी हल्ला करता येणे शक्य असतांनाही यशवंतरावांनी तसे का केले नाही असा प्रश्न काही नरवणेंसारखे इतिहासकार उपस्थित करतात. वस्तुस्थिती ही आहे कि अमिरखान इंग्रजांना मिळालेला आहे व वरकरणी आपल्यासोबत असल्याचे नाटक करतो आहे हे यशवंतरावांना कळुन चुकले होते. त्यात इंग्रज वकील खुद्द जाट राजा रणजितसिंहास भेटुन यशवंतरावांचा पाठिंबा काढुन घेण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करत आहेत हेही त्यांना समजलेले होते. जाट राजा बदलु नये अशी आशा असली तरी प्राप्त स्थितीत काही सांगता येत नव्हते. शिवाय ते अजुन काही राजे आपल्या बाजुने मदतीला उभे राहतील व ठिकठिकाणी इंग्रजांविरुद्ध युद्धे सुरु करता कशी येतील या प्रयत्नांतही होते. त्यामुळे लेकला दमवत रहायचे आणि मगच निर्णायक लढाई करण्याचा त्यांनी निर्णय घेतला असने स्वाभाविक होते. आपले कमीत कमी नुकसान होवुन त्यांना लेकची जिरवायची होती. आजवर सर्वाधिक नुकसान तर लेकचेच झालेले होते. त्याउलट यशवंतरावांची हानी अत्यल्प होती.

लेक वाट पहात होता ती किल्ल्याला भगदाडे पाडु शकतील अशा दारुगोळ्याची व अधिक बटालियन्सची. ती पोहोचताच त्याने अंतिम संघर्षाचा पवित्रा घेतला. बाजुने उंच मचाने बांधुन त्यावर तोफा चढवल्या. त्यामुळे तोफगोळ्यांचा भडिमार किल्ल्याच्या आत पोचुन प्रचंड हानी करता येणार होती. सर्व तयारी झाल्यानंतर २० फेब्रुवारीला मात्र त्याने जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात त्याने प्रचंड दारुगोळा वापरला. तोफगोळे किल्ल्याच्या आत जसे वर्षले जात होते तसेच तटावरही. ३-४ तासांच्या सलग भडिमारानंतर किल्ल्याला मोठे भगदाड पडले. लेकने क्यप्टन टेलरच्या नेत्रुत्वाखाली सैन्याला किल्ल्यात घुसण्याचा आदेश दिला. इंग्रज सैन्य जोरकस चाल करुन पुढे सरकले.

पण हा प्रयत्न पुरता अयशस्वी झाला. या सैन्यावर ज्या आवेशाने होळकरी सैन्याने प्रतिहल्ला चढवला त्याला तोड नाही. तोफा, बंदुकांचा अजस्त्र भडिमार सुरु झाला. भगदाडातुन इंग्रज आत जावु शकले नाही पण त्या भगदाडातुन होळकरी सैन्य बाहेर आले आणि इंग्रज सैन्यावर तुटुन पडले. इंग्रजी सैन्याला माघार घ्यावी लागली. या युद्धात पुन्हा त्यांचे ५-६०० सैन्य गारद झाले. लेकला हा मोठा झटकाच होता. कारण या पराभवामुळे सैन्याचे मनोधैर्यच खचले होते.
दुस-या दिवशी लेकने आपल्या सैन्याच्या परेडसमोर भाषण दिले. सैन्याचे मनोधैर्य उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तोही फार मोठा सेनानी होता. त्याचे नेत्रुत्वगुण अद्भुत होतेच. त्याने त्याच्या सैन्याला कालचा पराभव विसरुन नेटाने आज यश मिळवण्यासाठी आवाहन केले. सैनिकांत पुन्हा प्राण संचारला.

लेकने त्या दिवशी उरली सुरली सर्व शक्ती पणाला लावुन हल्ला केला. पण होळकरी सैन्याने जो भिषण प्रतिकार केला त्याला जागतीक इतिहासात तोड नाही. किल्ल्याच्या तटावरुन तोफा, बंदुका, रोकेट्स, एवढेच काय पण दगडधोंड्यांचांही एवढा जबरदस्त मारा केला कि त्यात लेकचे अर्ध्याहुन अधिक सैन्य गारद झाले. साडेचार तास चाललेल्या या भिषण युद्धात होळकरी सैन्याने जी अमित पराक्रमाची शर्थ केली ती कोठेही अन्यत्र आढळत नाही. या युद्धात जे उरले सुरले सैन्य होते ते वाट फुटेल तिकडे पळत सुटले. जे घायाळ होवुन रणांगणावर पडले होते त्यांना उचलुन नेण्याची शुद्धही इंग्रजी सैन्याला राहिली नाही. खरे तर इंग्रजी सैन्य हे अशा शिस्तीसाठी प्रसिद्ध होते...पण दुस-यांदा त्यांची शिस्त मोडली होती. त्या घायाळांवर होळकरी सैन्याने कसलीही दया दाखवली नाही. त्यांना किल्ल्याबाहेर पडुन होळकरी सैनिकांनी ठार मारले. लेकला असा पराभव आजतागायत स्वीकारावा लागला नव्हता. लेकचे यशवंतरावांना जिंकण्याच्या प्रयत्नाच्या नादात ३२९२ सैनिक ठार झाले. त्यात १०३ युरोपियन होते. क्यप्टन टेलर, लेफ्ट. कर्नल डोन, क्यप्टन ग्रांट हेसुद्धा या युद्धात ठार झाले. यशवंतराव अजिंक्यच राहिले.

या युद्धातील अभुतपुर्व विजयामुळे यशवंतरावांना पुढे भारताचे नेपोलियन म्हणुन युरोपियन जगतात ओळखले जावू लागले.

या युद्धाने जगज्जेत्या शत्रुचे कंबरडे मोडले होते. त्यांचा गर्व चकनाचुर झाला होता...त्याचा मानहानीकारक पराभव झाला होता......आता इंग्रज देशाबाहेर हाकलणारच ही उमेद जागी होणे स्वभाविक होते.

पण...

या पण आणि परंतुंनी यशवंतरावांच्या जीवनात थैमान घातले होते.

Saturday, April 26, 2014

दिल्लीवर स्वारी!


दिल्लीचा बादशहा या काळात इंग्रजांच्या ताब्यात होता. हवी तशी शाही फर्माने इंग्रज त्याच्याकरवी काढून घेत त्यामुळे यशवंतरावांनी वारंवार एकत्र येण्याची हाक देउनही अन्य रजवाडे प्रतिसाद देत नव्हते. मोन्सनवरील एवढ्या अशक्यप्राय विजयामुळेसुद्धा अन्य सम्स्थानिकांचे डोळे उघडले नव्हते. एकटा यशवंतराव इंग्रजांना माती चारु शकतो, जर आपण सारे एकत्र झालो तर काय होऊ शकते याचे त्यांना भान नव्हते. तरीही यशवंतराव आशावादी होते. शिंदेंशी असलेले हाडवैर विसरुन त्यांनाही ते संग्रामात सामील होण्याची आवाहने करत होते.

मोन्सनवरील विजयानंतर आता पातशहा शाह आलम (२) याला इंग्रजांच्या तावडीतून मूक्त करण्याचा अत्यंत धाडसी बेत यशवंतरावांनी आखला. पातशहाला सोडवायचे व त्याच वेळीस शिंदे-भोसलेंच्या मदतीने इंग्रजांची राजधानी कलकत्ता जिंकायची आणि इंग्रजांना येथुन गाशा गुंडाळायला भाग पाडायचे हा त्यांचा मनसुबा होता...

भारताच्या इतिहासातील एक दुर्दैवी भाग म्हणजे पातशाही फर्मानांना आलेले अवाजवी महत्व. पातशहा कितीही दुर्बळ, मुर्ख असला तरी ती नष्ट करावी आणि नवी केंद्रीभूत व्यवस्था आणावी असा विचार कोणीही केला नव्हता. त्या मानसिकतेचे सर्वकश चिंतन पुढे आपल्याला करावे लागणार आहे. १८५७ पर्यंत पातशाही फर्मानांचे महत्व इंग्रजांनीही अबाधित ठेवले हेही विशेष. भारतीय जनतेवर बहुदा तख्ताचे अद्भूत गारुड होते. भारतीयांच्या दृष्टीने तीच केंद्रीय सत्ता होती, मग स्थानिक राजवट कोणाचीही आणि कशीही असो. अगदी नाण्यांवरसुद्धा एका बाजुने पातशाही छाप असायचा. पुढे यशवंतरावांनीच दोन्ही बाजुला स्वत:चेच छाप असलेली नाणी पाडून पातशाही केंद्रीय सत्तेलाही आवाहन दिले होते. पण त्याबद्दल पुढे.

मोन्सनच्या भिषण पराभवामुळे इंग्रज गळाठुन गेला आहे तोवर दिल्लीवरच झंझावाती स्वारी करुन, दिल्ली जिंकुन पातशहाला मुक्त करावे हा अत्यंत धाडसी निर्णय यशवंतरावांनी घेतला. यामागे पातशहाला सोडवून आपल्या ताब्यात घेता आले तर नवी फर्माने काढून सर्व राजे-रजवाड्यांना स्वातंत्र्ययुद्धात सहभागी करून घेता येईल अशी यशवंतरावांची रास्त कल्पना होती. ती वास्तवात आली असती तर यशवंतरावांचा संघर्ष एकाकी राहिला नसता.

यशवंतराव वेगाने निर्णय घेणे आणि ते अंमलात आणने यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी तशी वेगाने चालही केली. आपले सैन्य तात्काळ पुनर्गठित केले. जवळपास ६० हजार घोडदळ, १५ ते १६००० पायदळ तसेच १९० ते २०० तोफाही त्यांच्यासोबत आल्या. याच वेळीस त्यांनी अजून एक चाल केली. दिल्लीला जात असता त्यांनी व्यंकोजी भोसलेंना पत्र पाठवुन शिंदेंना सोबत घेत त्यांना कलकत्त्यावर स्वारी करण्याच्या सुचना दिल्या. तेंव्हा इंग्रजांची राजधानी कलकत्त्याला होती. भोसलेंच्या पराक्रमी सैन्याच्या तो पायाखालचा प्रदेश. एकाच वेळीस दिल्ली आणि कलकत्त्यावर आक्रमणे झाली तर इंग्रजांचा पराभव निश्चितच होता. भोसलेंनीही त्याबरहुकुम चाल करतो असे यशवंतरावांना लिहिले खरे, पण दुर्दैवाने शेवटपर्यंत त्यांनी कसलीही हालचाल केली नाही. (नंतर यशवंतरावांनी भोसल्यांना जे पत्र पाठवले ते अंगावर शहारे आणील इतके हृदयविदारक आहे.)

दिल्लीकडे जातांना त्यांनी प्रथम मथुरेवर हल्ला केला. हल्ला होताच तेथील इंग्रज लगोलग शहर सोडुन पळुन गेले. यशवंतरावांनी मथुरेतुन खंडणी गोळा केली व आपल्या इमानी पराक्रमी सैनिकांचे पगार भागवले.

८ आक्टोबर १८०४ रोजी त्यांनी दिल्लीला वेढा घातला. तोफांचा भडीमार सुरु केला. लेफ्ट. कर्नल ओश्टर्लनी व लेफ्ट. कर्नल बर्न हे तेंव्हा दिल्लीचे रक्षण करत होते. इंग्रजांनी यशवंतराव पार दिल्लीवर हमला करेल याची कल्पना केली नव्हती. त्यामुळे ते पुन्हा गडबडुन गेले. सावरताच त्यांनीही प्रतिकार सुरु केला. दिल्लीच्या तटबंदी तशा भरभक्कम. यशवंतरावांनी वेगवेगळ्या आघाड्यांवरुन दिल्लीचा पाडाव करण्याचे प्रयत्न सुरु केले. एकच धुमश्चक्री उडाली. यशवंतराव आपल्या मुक्ततेसाठी आले आहेत ही वार्ता पातशहाला समजताच त्याच्याही स्वातंत्र्याच्या आशा जाग्या झाल्या. खास दरबार भरवुन त्यांनी यशवंतरावांच्या यशासाठी मन्नती मागितल्या व यशवंतरावांना "महाराजाधिराज राज-राजेश्वर अलिजाबहाद्दुर" असा किताब बहाल केला.

इकडे यशवंतरावांची जंग सुरुच होती, वेढ्याचा गच्च फास दिल्लीभोवती त्यांनी आवळला होता.

जनरल लेकला हे व्रुत्त मिळताच तो जमेल तेवढे सैन्य घेवुन दिल्लीच्या रोखाने मथुरामार्गे निघाला.

यशवंतरावांच्या युद्धकौशल्याचा अनुभव ताजा असल्याने सरळ मार्गाने या माणसाला परास्त करता येणार नाही याचे भान त्याला होते. तो अत्यंत कुटील नीती खेळला.

दिल्ली जिंकनार याचा यशवंतरावांना आत्मविश्वास होता. दिल्लीच्या अभेद्य तटबंद्या ढासळू लागल्या होत्या. त्यात दिल्लीच्या रहिवाशांनीही आतून यशवंतरावांना मदत पुरवणे सुरू केले होते. इंग्रजी सैन्य घयकुतीला आले होते. लेकची मदत आली तरच दिल्ली राखता येईल अशी परिस्थिती बनली होती.

पण...

भारतिय इतिहासात असे "पण" खुपदा आले आहेत. स्वातंत्र्याच्या संध्या हातातोंडाशी येवून निसटलेल्या आहेत.

युद्ध ऐन भरात असतांना यशवंतरावांचा जीवलग मित्र, सल्लागार आणि मुख्य सेनानी भवानी शंकर खत्री हा इंग्रजांना फुटला. तो अचानक आपल्या अखत्यारीतील सैन्य घेऊन चालता झाला. त्यामुळे वेढा ढीला पडला. यशवंतरावांच्या सैन्याचे मनोधैर्य या अनपेक्षित घटनेमुळे गारद झाले. या जीवलग मित्राने केलेल्या विश्वासघातामुळे यशवंतरावांना मोठा मानसिक धक्का बसणे स्वाभाविक होते. त्यांच्या सैन्याचीही यात हानी होऊ लागली.  दिल्लीचा वेढा आता पुढे सुरु ठेवण्यात अर्थ उरला नव्हता. त्यात जनरल लेक जवळ येवुन पोहोचला होता. पण तरीही त्याची यशवंतरावांच्या आहे त्या सैन्यावर आक्रमण करण्याचे धाडस त्याला झाले नाही.

पण यशवंतरावांनी वेढा उठवला. अजुन काही फितुर होण्याची आशंका त्यांना वाटत असावी. ऐन युद्धाच्या भरात पुन्हा असे काही खाले तर त्याचे परिणाम अंगलट येणार होते. हातातोंडाशी आलेली जित त्यांना फितुरीमुळे सोडावी लागली.

भवानी शंकरला इंग्रजांनी काय आमिषे देवून फोडले याचा तपशिल माल्कम वा अन्य इंग्रजी साधनांत मिळत नाही. पण ही फोडाफोड करण्यासाठी इंग्रज आधीपासून प्रयत्नांत असावेत.

  आजही तुम्ही जुन्या दिल्लीत गेलात तर चांदणी चौकाजवळ भवानी शंकर खत्रीची हवेली उभी आहे...तिला आजही ओळखले जाते "निमक हराम कि हवेली" म्हणुन, एवढा दिल्लीवासियांच्या मनात खत्रीचा तिरस्कार आजही भरलेला आहे. दिल्लीच्या स्वातंत्र्याचा रस्ता हा भारताच्या स्वातंत्र्याचा रस्ता होता जो या स्वार्थलोपुपामुळे बंद झाला.

वेढा तर उठवला, याचा अर्थ त्यांनी माघार घेतली नव्हती. ते खचले वा निराश झाले नव्हते. ग्रीक मित्थकथेतील महावीर ऒडीसियसप्रमाने अविरत संघर्षाला ते नेहमीच सिद्ध राहिले होते. त्यांनी भरतपुरच्या महाराजा रणजितसिंगांना भेटुन त्यांना या युद्धात सामील करुन घेण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले. ते डीगच्या दिशेने निघाले. जनरल लेकला त्यांना अडवण्याचीही हिम्मत झाली नाही. याबद्दल त्याला कंपनी सरकारने नंतर खुप धारेवर धरले होते.

यशवंतरावांनी दिल्ली सोडल्यानंतर दोआब अक्षरशा: उद्वस्त करत ते अयोद्धेच्या नबाबाला येवुन भेटले. पण नबाबाने इंग्रजांची साथ सोडायला नकार दिला. अन्यत्र ते अजुनही पत्रे पाठवतच होते. अगदी भोसले व शिंदेंनाही. पण उपाय लागला नाही. दिल्लीवर स्वारी करण्याआधीच त्यांनी भोसलेंना शिंदेंसह कलकत्त्यावर स्वारी करावी अशी आळवणी केली होती. तसे झाले असते तर इंग्रजांची फौज दुभंगली असती. अत्यंत वेगळ्या आघाड्यांवर त्यांना लढता येणे अशक्य झाले असते. पण ते व्हायचे नव्हते.

भारताला हा फंदफितुरीचा, विश्वासघातांचा शाप कधीपासून लागलाय कोण जाणे?

कि पारतंत्र्यात राहण्यातच लोकांना आणि मुत्सद्दींना आपली सोय वाटत होती?

सिंधू संस्कृतीवरील अप्रतिम लघुपट!

हा सिंधू संस्कृतीवरील एक अप्रतिम लघुपट आहे. तासाभराचा असला तरी पाहिलाच पाहिजे असा.

कोणतीही संस्कृती काही शहरे नष्ट झाली, पर्यावरणीय अथवा आर्थिक अवनतीमुळे शहरे रिती करावी लागली म्हणून समूळ नष्ट होत नसते. सिंधू नदीच्या खो-यात आजही सिंधू संस्कृतीत जशा सपाट तळाच्या नौका वापरल्या जात तशाच आजही वापरल्या जातात. विहिरींच्या, मृद्भांड्यांच्या डिझाईनमद्धे विशेष फरक पडला नाही. तशीच मृद्भांडी आजही बनवली जातात...तशाच विहिरी आजही सर्वत्र सापडतात.

या लघुपटात तत्कालीन संस्कृतीची अनवट रहस्ये उलगडली जातात. त्या काळात आपल्या देशाचे नांव "मेलुहा" असे होते. आपला व्यापार मेसोपोटेमिया, सुमेरिया, अरबस्थान ई देशांशी समुद्रमार्गाने होत असे. सिंधु संस्कृतीने निर्यात केलेल्या अनेक वस्तुंचे अवशेष तिकडे उत्खननांत सापडले आहेत. कसा झाला असेल दोन टोकाच्या संस्कृत्यांतील पहिला संपर्क? कसा त्यांनी संवाद साधला असेल? मानव मुळातच आदिम संवादी प्रेरणांनी भारावलेला राहिला आहे. त्यांनी काहीतरी मार्ग शोधलाच असेल. भाषिक/सांस्कृतिक देवानघेवाणीही झाल्याच असतील यात शंका नाही.

या लघुपटात ढोलवीरा येथील पुरातत्वीय अवशेषांतून अनेक रहस्ये उलगडलेली आहेत. मला सर्वात भारावून टाकले ते तेथील जल-व्यवस्थापन पद्धतीने. कच्छ हा तसा पाण्याच्या बाबतीत दुष्काळी भाग. तेंव्हाही स्थिती वेगळी नव्हती. पण पावसाळ्यातील नदीतून येणारे पाणी अडवून ढोलवीराभोवती बनवलेल्या अवाढव्य अशा ७ टाक्यांत ते पाणी अत्यंत वैज्ञानिक आखणी करून कसे जमा केले जात होते याचे थ्री-डी पुनर्निर्मित आराखड्यातून दिसते आणि आपण थक्क होतो. एवढेच नव्हे तर इमारतींच्या छतांवर जमा होणारे पाणीही या टाक्यांपर्यंत पोहोचवले जात असे. हे पाणी पिण्यासाठी तसेच शेतीला पुरवठा करण्यासाठी वापरले जात असे. आम्हाला आमच्या या महान पुर्वजांकडून आजही खूप शिकण्यासारखे आहे हे खरे.

या लघुपटात चारण लोक अजुनही प्राचीन काळी घग्गर नदी कशी वाहती होती, त्यात मासे कसे खेळत असायचे याची कवने गात असतात. घग्गर नदी सुकून आता जवळपास साडेतीन हजार वर्ष झाली आहेत. संस्कृतीचा प्रवाह जनस्मृतींतून, लोककाव्य-संगीतांतुन कसा हजारो वर्ष अविरत वाहत असतो याचे आपल्याला दर्शन घडते.

वेळ मिळेल तेंव्हा किंवा जमेल तसा हा लघुपट अवश्य पहावा.

http://s1.zetaboards.com/anthroscape/topic/5402193/1/

Friday, April 25, 2014

मुकंद-याचे युद्ध: भारतीय युद्धेतिहासातील लखलखते सोनेरी पान!


भर पावसात २५० मैलांचा झंझावाती पाठलाग....मोन्सनच्या सेनेचा पुरता खात्मा...


दरम्यान शिंदे-भोसलेंचा पराभव हा मुख्यत: घरभेद्यांमुळे झाला आहे तसे आपले होवु नये यासाठी यशवंतराव दक्ष होतेच. त्यांच्या पदरी अनेक इंग्रजी सेनानी होते. त्यापैकी काही लेकला सामील आहेत अशी शंका त्यांना आली. नंतर तसे प्रत्यक्ष पुरावे मिळाल्यावर त्यांनी तडकाफडकी दोषी व संशयितांना अटक केली. दोषींना त्यांनी तात्काळ देहांत शासन केले. यात क्यप्टन व्हिकार, टोड आणि रायनसारखे मातब्बर अधिकारीही होते. जवळपास दोनशे घरभेद्यांना फटके देवुन त्यांना हाकलुन दिले.

इंग्रजांनी आपले सर्व सामर्थ्य या युद्धात पणाला लावायचे ठरवले होते. फोसेटच्या पराभवामुळे तर गांभिर्यात अधिकच भर पडली होती. इंग्रजांचे भारतातील भवितव्य ठरवणारे हे युद्ध होते. त्यानुसार देशभरातुन त्यांच्या सेना एकत्र होण्यासाठी होळकरी राज्याकडे वाटचाल करु लागल्या. जनरल जेरार्ड लेक उत्तरेकडुन निघाला तर वेलस्ली दक्षीणेकडुन, कर्नल मरे गुजरातेकडुन निघाला तर कर्नल मोन्सन जयपुरकडुन.

यशवंतरावांचे इंग्रजी सैन्याच्या हालचालींवर पुर्ण लक्ष होते. प्रसंग तसा बाका होता. इंग्रजांच्या बाजुने देशातील सारे रजवाडे होते...आधुनिक सैन्य व तोफांची रेलचेल होती...

तर यशवंतराव पुर्ण एकाकी...स्वबळावर या परकिय साम्राज्यवाद्यांशी झुंज घ्यायला एकटे उभे ठाकलेले होते.

ते तयारीत होते. गरुड जसा भक्षावर झडप घालायला घात लावुन बसलेला असतो तसे तेही इंग्रजांवर आघात करायला सज्ज होते...

मोन्सनची बलाढ्य फौज जयपुरवरुन निघाली होती. येतांना त्याने होळकरांचा टोंक-रामपुरा विभाग जिंकुन घेतला. विवक्षीत ठिकाणी त्याच्या व मरेच्या फौजेची गाठ पडणार होती. सर्व फौजा एकत्र येताच होळकरांवर हल्ला करण्याची त्यांची योजना होती.

पण ती योजना यशस्वी होवू देतील ते यशवंतराव कसले?

यशवंतरावांनी ते एकत्र येण्याआधीच मोन्सनला तोंड दाखवले, किरकोळ चमक केली आणि सरळ माघार घेतली. मोन्सनला वाटले, यशवंतराव घाबरला, त्याने यशवंतरावांचा पाठलाग सुरु केला. वाटेत अधुन मधुन यशवंतराव त्याच्याशी किरकोळ चकमक करीत आणि पुन्हा पळत सुटत.
मोन्सनने मुकुंदरा घाटही ओलांडला. यशवंतराव सामोरे न येता त्याला पाठ दाखवत आपल्या प्रदेशातच घुसत राहिले. मोन्सनला आपण या नादात सापळ्यात अडकत आहोत याचे भानच आले नाही. त्याला वाटले कि यशवंतराव घाबरुन पळत आहेत. मुकुंद-यापासुन ५० मैलावर असलेला हिंगलेशगढही त्याने जिंकुन घेतला. होळकरांनी तेथेही कसलाही प्रतिकार केला नाही. येथे एक वेगळीच गंमत झाली. ज्या दिशेने यशवंतराव चालले होते नेमक्या त्याच दिशेला मरेचा तळ होता. त्यामुळे मरेला वाटले कि यशवंतराव आपल्यावरच चालून येत आहेत. मरे व मोन्सनमधील दळन-वळन यशवंतरावांनी पार तोडून टाकले होते त्यामुळे मोन्सन यशवंतरावांच्या पाठीशी आहे हे त्याला समजलेच नाही. मरे अद्याप एकट्याने युद्ध करण्याच्या तयारीत नव्हता. तो अजून माघारी सरकत गेला.

या पाठलागाच्या नादात मोन्सनजवळ आता फार तर दोन दिवस पुरेल एवढा शिधा होता. आता तो यशवंतरावांच्या प्रदेशात होता. येथे शिधा मिळायची मारामार व्हायला लागली. आता युद्धाशिवाय वा मागे हटण्याशिवाय त्याच्याजवळ पर्याय उरला नाही. चंबळ ओलांडता येणे त्याला अशक्यप्राय होते. यशवंतरावही एव्हाना चंबळेजवळ येवुन पोहोचले होते. शेवटी नाईलाजाने न लढताच क्यप्टन ल्युकान या अधिका-याजवळ जड सामान देवुन परत वेगाने मुकुंदरा खिंडीकडे माघारी वळायचे मोन्सनने ठरवले. खरे तर त्याला दुसरी दिशाही उरलेली नव्हती.

बहिरी ससान्याने संधी मिळताच भक्षावर धाड घालावी तसे मोन्सन चंबलकाठावरून हलताच यशवंतरावांनी पुर्ण शक्तीनिशी ल्युकानच्या सैन्यावर हल्ला चढवला. हा हल्ला एवढा भिषण होता कि ल्युकानचा एकही सैनिक वा बुणगा वाचला नाही. सर्वांना कापुन काढले गेले. ल्युकानचे काय झाले हे समजले नाही पण त्याचा म्रुत्यु बहुदा होळकरांच्या कैदेत झाला असावा असा अंदाज टोम होम्बर्गसारखे पाश्चात्य इतिहासकार व्यक्त करतात. ल्युकानजवळील जड तोफा व अन्य सामग्री यशवंतरावांच्या हाती लागली.

आता स्थिती बदललली. आता मोन्सन पळत सुटला तर शिका-यासारखे आपल्या घोडदळासह यशवंतराव त्याच्या मागे लागले. यशवंतरावांचे पायदळ व तोफा मागुन येत राहिल्या.

१० जुलै 
१८०४ ला यशवंतरावांनी मुकुंदरा खिंडीजवळ मोन्सनला गाठले. त्यांनी मोन्सन व सर्व सैन्याला हत्यारे येथेच ठेवुन आग्र्याला निघुन जा असा आदेशच बजावला. मोन्सन तो आदेश पाळणे शक्य नव्हते. तो पळतच राहिला. त्यात यशवंतरावांचा तोफखाना व पायदळ जवळ येते आहे या वार्तेने त्याची हडेलहंबी उडाली होती. त्यात त्याच्याकडील शिधा संपला होता. उपासमार चालु होती. यशवंतरावांचे हल्ले परतवण्याचा प्रयत्न करत त्याचे पलायन सुरुच होते. त्यात कर्दनकाळासारखा पावसाळा सुरु झाला. मोन्सनचे पलायन अजुन कठीण झाले. गाळाच्या मातीच्या त्या मैदानी प्रदेशात चिखल एवढा झाला कि रुतत रुतत पुढे सरकणे नशीबी आले. पण तरीही यशवंतरावांनी अजुन निर्णायक हल्ला केला नाही.

मोन्सनने कोट्याच्या राजाकडे, जालीमसिंगकडे, एक रात्र मुक्काम केला. अनेक दिवसांनी त्याला व त्याच्या सैन्याला पोटाला मिलाले. जालीमसिंगने दिलेल्या नावांच्या मदतीने त्याने दुथडी भरुन वाहणारी चंबळ ओलांडली. आता तरी यशवंतराव पाठलाग थांबवतील अशी आशा त्याला होती. पण येथे गाठ जिद्दी यशवंतरावांशी होती. त्यांनीही चंबळ ओलांडली. धिम्या गतीने पाठलाग सुरुच राहिला. मोन्सनला जमेल तेवढ्या वेगाने पुढे पळने आले.

चंबळेच्या परिसरातील रोंरावत वाहणा-या नाल्यांमुळे त्याची अजुनच फजीती झाली. त्या काळ्या मातीच्या चिखलात त्यांना आपल्या तोफा ओढताही येईना झाल्यावर त्या त्याला आहे तेथेच सोडाव्या लागल्या. अनेक हत्ती व उंटही चिखलात रुतुन बसु लागल्याने अनेकांना मागे सोडावे लागले. मागुन येणारे यशवंतराव त्या तोफा आपल्या ताब्यात घेत पुढे सरकत राहिले. अशा प्रकोपी नैसर्गिक स्थितीत कसे लढावे हे त्यांना चांगलेच ठावुक होते. मोन्सनच्या मदतीला आता मरे काय वा वेलस्ली काय, येणे शक्यच नव्हते. सर्वांमधील दलन-वळन पार तुटले होते. सर्व इंग्रजी सैन्याची पराकोटीची कोंडी करुन टाकली गेली होती.

२३ जुलैला मोन्सनने एक दुथडी भरुन वाहनारा चंबळी ओढा हत्तींच्या सहाय्याने ओलांडायला सुरुवात केली. तो पहिल्या दिवशी फक्त एकच गनर्सची बटालियन पार करु शकला. दुस-या दिवशी होळकरांच्या घोददळाच्या तुकडीने अचानक हल्ला केला. मोन्सनच्या सैन्यात एकच गोधळ उडाला. चकमक दिवसभर टिकली. होळकरांची सर्वच सेना तोवर आली तर आपल्याला या ओढ्यातच जलसमाधी घ्यावी लागेल हे लक्षात येताच मोन्सनने तिस-या दिवशी कर्नल डोनला दोन बटालियन्ससहित पुढे पाठवले व रामपुरा गाठायला सांगितले. स्वत: त्याने त्या दिवशी ओढा ओलांडला व वेगळ्या मार्गने रामपु-याकडे निघाला.

रामपुरा किल्ल्यात आल्यावर त्याला वाटले आता आपल्याला उसंत मिळाली. तेथे त्याला रसद, अधिकच्या बटलियन्स व खजिनाही मदतीला मिळाला.

पण होळकर शिका-यासारखे त्याच्या पाठीवरच होते. शत्रुला उसंत घेवु द्यायचीच नाही असाच जणु काही त्यांचा निर्धार होता. शत्रुचे मनोबल खच्ची करत नेत, बाकी अन्यत्र असलेल्या इंग्रजी फौजांतही अनिश्चिततेचे सावट निर्माण करण्यात ते पुर्ण यशस्वी झाले होते. मोन्सनला त्यांनी अक्षरशा खेळवले होते.

यशवंतराव अजुनही पाठलागावर आहेत हे लक्षात येताच २० आगस्ट १८०४ ला मोन्सन पुन्हा पळत सुटला. टेचून यशवंतरावांचा प्रतिकार करण्याची त्याची इच्छाशक्ती पार मावळली होती. २२ तारखेला तो बनास नदीजवळ आला. या नदीलाही पुर आलेला होता...ती ओलांडता येणे शक्य दिसत नव्हते. तरीही त्याने काही बटालियन्स व जड सामान स्थानिक नाविकांच्या मदतीने नदीपार करण्यात यश मिळवले. तोवर २४ तारखेला यशवंतराव तेथे येवुन धडकले. निम्म्यापेक्षा अधिक सैन्य नदीपार झाले असल्याने त्य्यांच्या मदतीचीही शक्यता उरलेली नव्हती. मागे रोंरावती नदी व समोर दोन्ही बाजुंनी होळकरांच्या सैन्याचा घेराव झाला. यशवंतरावांनी घोडेस्वारांना पायउतार होण्याची आज्ञा दिली.

यानंतर धमासान युद्ध झाले. अलीकडील तीरावरील मोन्सनचे सर्व सैन्य ठार झाले. त्यात त्याचे महत्वाचे १३ सेनानीही होते. होळकरी सैन्याचा भिषण आघात पाहून स्वत: मोन्सन युद्ध ऐन भरात असतांनाच नदीपार पळून गेला आणि कसाबसा कुशलगढला उरलेल्या सैन्यासह जावुन पोहोचला. 


तेथे थकलेल्या सैन्याला आराम आणि पोटाला रोटी मिळते न मिळते तोच यशवंतराव पुन्हा नजिक आल्याची खबर आली. उलटुन लढाई करण्याच्या स्थितीत मोन्सन नव्हताच...त्याने धो-धो पावसात पुन्हा पळायला सुरुवात केली. आता आग्रा गाठण्याचा त्याचा इरादा होता. तेथवर यशवंतराव येणार नाहीत असा अजुन त्याचा कयास होता.

पण आताचे पलायन सोपे नव्हते. मोन्सनचे सैन्य घाबरले होते. एरवी इंग्रजी कंपू सैन्यात असलेली शिस्त प्रथमच मोडली होती. होळकरांची फौज पाठलाग करता करता गोळीबाराचा भडिमार करत होती. कोठे थांबले कि तोफांचा भडिमार होत होता. ्त्यात विनाश पाहून अनेक अधिकारी मोन्सनलाही सोडुन पळुन जायला लागले. बुणगे आणि सैन्यात सरमिसळ होवु लागली. गावा-खेड्यातील नागरिकही मोन्सनच्या पळत्या सैन्यावर हल्ले करु लागले. दगडफेक करू लागले.

फतेहपुरला मात्र यशवंतराव होळकरांनी मोन्सनवर भिषण आणि अंतिम हल्ला चढवला. मोन्सनला शरणागती पत्करण्याखेरीज गत्यंतर उरले नाही. येथवर त्याचे जवळपास १० हजार सैनिक आणि २ ते ३ हजार बुणगे, या अडिच महिन्यात होळकरांनी पळापळी करायला लावुन केलेल्या हल्ल्यांत, ठार झाले होते.

एवढा अवमानस्पद पराभव इंग्रजांचा कधीच झाला नव्हता. पावसाळ्यात मराठी सैन्य सुस्त असते, लष्करी हालचाली करत नाही हा जो काही फाजिल आत्मविश्वासात व गैरसमजात जनरल जेरार्ड लेक होता तो धुळीला मिळाला होता. एखाद्या सावजाला दमादमाने दमवुन मारावे तसे मोन्सनच्या बलशाली सैन्याचे झाले होते. २८ आगस्ट १८०४ रोजी हा महाविजय, तोही इंग्रजांविरुद्ध यशवंतरावांनी मिळवला.

मोन्सन ३० आगस्टला जगल्या-वाचल्या २-३०० सैनिकांसह आग्र्याला पोहोचला...
पराभुताच्या स्वागताला कोण येनार?

जनरल वेलस्ली या भिषण पराभवाची वार्ता ऐकुन हतबुद्ध झाला होता. यशवंतरावांविरुद्ध केलेली सर्व व्युहरचना अंगलट आली होती. लेक किंवा मरे मोन्सनला कसलीही मदत 
पोहोचवू शकले नव्हते. जी हानी व्हायची ती झाली होतीच...पण संभाव्य हानी आता कशी टाळायची याचीच विवंचना त्याला जास्त लागुन राहिली होती. त्याने अक्षरशा हादरुन एका पत्रात लिहिले..."You will have heard of Monson's reverses: I tremble for the political consequences of these events." (मोन्सनच्या पराभवाचे राजकीय परिणाम काय होतील या विचारानेच मला थरकाप सुटला आहे.) पराभव माहित नसलेल्या इंग्रजी सैन्याचे मनोधैर्य तर खचलेच पण त्याचे पडसाद इंग्लंडमद्धेही उमटले.

वेलस्लीची गच्छंती अटळ झाली.

या पराभवाने इंग्रजांनी माती खाल्ली. त्यांचा लष्करी माज पुरेपुर उतरला. त्यांची लषकराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. त्यांचे सारे बेत उधळले गेले. या पराभवामुळे आता भारतीय रजवाडे यशवंतरावांच्या बरोबर जाणार अशी शंका त्यांना छळु लागली.

यशवंतराव हे खरेच एक विलक्षण व्यक्तिमत्व होते...त्यांचे अपार धाडस, निर्णयक्षमता, हालचालींतील वेग, प्रचंड पराक्रमी व्रुत्ती...मुत्सद्दीपणा...अडिचशे मैल सतत उसंत न घेता, शत्रुला घेवु न देता त्या प्रलयंकारी पावसाळ्यात, दोन पुराने ओथंबुन वाहणा-या नद्या ओलांडत...पाठलाग करत खेचलेला हा विजय...अन्य कोणाही योद्ध्याने असले अचाट साहस केले नसते!

दुसरे स्वराज्य त्यांनी निर्माण केलेच होते...आता ते राष्ट्र स्वतंत्र करणार होते...तेवढी क्षमता त्यांच्यात होती...इंग्रजांचा राष्ट्राला असलेला धोका त्यांनी नुसता ओळखला नव्हता...तो धोका दुर करण्यासाठी त्यांनी कंबर कसली होती...भारतमातेचा खरा महान सुपुत्र अशीच इतिहासाने येथुन पुढे त्यांची नोंद घावी एवढे अचाट, लोकविलक्षण आणि अद्वितीय असे त्यांचे कर्तुत्व आहे यात कोणीही शंका बाळगण्याचे कारण नाही!

या युद्धाबद्दल प्रसिद्ध इतिहासकार जोन पेंबल म्हणतो... "Here was a Maratha leader who, though encumbered with something like 200 guns, managed to pursue and harass, at the height of the monsoon, through the black cotton soil of Malwa and across two rivers, a lightly equipped British force for a distance of 250 miles. It was a remarkable achievement, which, as Lake admitted, 'afforded proofs of a greater degree of efficiency and enterprise than could have been expected, and rendered it difficult to estimate what they might venture to undertake or be able to accomplish.'"


कट्टर शत्रुनेही तारीफ करावी...असा हा अशक्यप्राय विजय...जागतिक युद्धेतिहासात नोंदले गेलेले हे युद्ध...आणि आम्हा पामरांना काहीच माहिती नसावी हे दुर्दैवच नव्हे काय?

इंग्रजांशी युद्ध सुरू!

१८०३ पर्यंत होळकरी राज्य सोडले तर इंग्रजांनी जवळपास देश आपल्या नियंत्रणाखाली आणला होता. यशवंतरावांच्या अपेक्षेप्रमानेच आता त्यांच्यावर तहासाठी दबाव आनण्यास सुरुवात केली. यशवंतरावांशी युद्ध करण्याची अजुन त्यांची मानसिकता बनलेली नव्हती. होळकरांचे लष्करी सामर्थ्य पुर्वीपेक्षा वाढलेले आहे याची त्यांना चांगलीच माहिती होती. 

होळकर बधत नाहीत हे पाहिल्यावर इंग्रजांनी मग यशवंतरावांना मैत्रीचा तह करण्याचे सुचवून बघितले. या तहानुसार (जर केला असता तर) इंग्रज होळकरांचे सार्वभौमत्व मान्य करत त्यांच्या प्रांतांत हस्तक्षेप करणार नव्हते, आक्रमण करणार नव्हते व त्या बदल्यात यशवंतरावांनी इंग्रजांशी वा त्यांच्या मांडलिकांशी युद्ध करायचे नव्हते. पण हा सर्व देखावा आहे, कधीतरी संधी मिळताच हे इंग्रज उलटणार याची जाणीव असल्याने यशवंतरावांनी इंग्रजांना तहासाठी उलट्या मागण्या पाठवल्या. त्या अशा होत्या:

१. इंग्रजांनी बुंदेलखंड व दोआबातील होळकरांच्या सर्व महालांचा ताबा यशवंतरावांना द्यायचा.

२. राजपुत व अन्य सर्व रजवाड्यांकडुन चौथाई वसुल करण्याचा अधिकार यशवंतरावांना द्यायचा.

मैत्रीच्या तहासाठी या मागण्या पाहुन इंग्रज हबकलेच. इंग्रजांचे वर्चस्व या मागण्या मान्य केल्या तर आपसुक घटत होते. जनरल लेकने या मागण्या धुडकावुन लावल्या. यशवंतरावांनाही तेच अपेक्षीत होते. ४ मार्च १८०४ रोजी यशवंतरावांनी लेकला लिहिलेल्या पत्रात म्हटले, :

"माझा देश आणि माझी संपत्ती माझ्या घोड्याच्या खोगिरावर आहे. ज्याही दिशेला माझ्या पराक्रमी सैनिकांचे घोडे वळतील त्या दिशेचा सर्व देश आम्ही जिंकुन घेवु. जर तुम्ही शहाणे आणि विचारी असाल तर माझे प्रतिनिधी सांगतील त्या महत्वाच्या विषयांचा आधी फडशा पाडाल..."

जनरलल लेकला असे सुनावणारा भारतात कोणी भेटला नव्हता.

जनरल लेकने २२ मार्च १८०४ रोजी वेलस्लीला पत्र लिहुन यशवंतरावांविरुद्ध युद्ध सुरु करण्याची काकुळतीने परवानगी मागितली. या पत्रात लेक काय म्हणतो हे वाचण्यासारखे आहे...हे पत्र कट्टर शत्रुने लिहिले आहे त्यामुळे त्याने त्यात स्वाभाविकपणेच यशवंतरावांना शिव्यांची लाखोली वाहिली आहे. शत्रुच्या शिव्या या पारितोषिकाप्रमाणेच घ्यायला पाहिजेत...या पत्रात लेक म्हणतो:

"जर होळकरला आत्ताच नष्ट केले नाही तर पावसाळ्यानंतर तो कमालीचा उपद्रवी ठरेल. या राक्षसाने मला जेवढे अस्वस्थ केले आहे तसे कधीही कोणी केले नसेल. हा माणुस इंग्रजांचा सर्वात घातक शत्रु आहे यात शंका बाळगु नये. अशा दरोडेखोराचे कौतुक करतांना मला संकोच वाटतो आहे. तो स्वत: माझ्यावर चालुन येणार नाही, असेच दडपण वाढवत राहील...आणि जर मी त्याच्यावर चालुन गेलो तर तो हुलकावन्या देत सरळ आपल्याच प्रदेशांत घुसुन वाटेत आडवे येईल ते उध्वस्त करत पुढे जाईल...".

यशवंतरावांची केवढी धास्ती इंग्रजांना होती हे या पत्रावरुन लक्षात येते. वेलस्ली स्वत: पराक्रमी सेनानी खरा...त्यानेच शिंदे-भोसलेंना असई-आडगावच्या युद्धांत धुळ चारली होती. पण त्याने तरीही जनरल लेकला यशवंतरावांवर हल्ला करण्याची परवानगी दिली नाही.

लेक यामुळे हात चोळत बसण्यापलीकडे काय करु शकत होता? अर्थात तो अगदीच स्वस्थ बसला होता असे नाही. त्याचे हेरखाते कार्यक्षम होतेच. त्याने यशवंतरावांच्या सैन्यातील कवायती कंपुंचे जेही इंग्रजी प्रमुख होते त्यांच्याशी संधान बांधायला सुरुवात केली होतीच. त्यांना फोडण्यासाठी तो वाट्टेल तेवढे पैसे ओतायला तयार होताच. यशवंतरावांची शक्ती कमी करणे हाच त्याचा हेतु होता.
त्यात त्याच्या हाती यशवंतरावांनी राजे-रजवाड्यांना इंग्रजांविरुद्ध त्याच्यासोबत येण्यासाठी आवाहने करणारी पत्रे लागली.

चार एप्रिल १८०४ ला लेकने ही पत्रे ताबदतोब वेलस्लीला पाठवली आणि निर्वाणीचा इशारा दिला कि जर एक जरी रजवाडा यशवंतरावांना सामील झाला तर इंग्रजांचे भारतातील बस्तान उखडुन फेकले जाईल. पत्रांतील मजकुरही खरेच खुप दाहक होता, त्यात इंग्रजंमुळे सारी संस्थाने कशी खालसा होते आहेत आणि आता त्याला उखडले नाही तर हिंदुस्तानातील "हिंदु" धर्मच काय इस्लामही उरणार नाही...तेंव्हा सारे एकत्र या...माझा घोडा आघाडीला आहे आणि आपण सारे या शत्रुला समुद्रापार हाकलण्यास सक्षम आहोत...असा मजकूर असे. ही पत्रे वाचुन आता वेलस्लीचाही नाईलाज झाला. होळकरांशी युद्ध म्हनजे पराकोटीची हानी हे सुत्र त्याला माहित होते. पण बाकी गप्प असलेले रजवाडे होलकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देवुन स्वातंत्र्याच्या लालसेने त्याला सामील झाले तर निर्माण होनारा धोका फारच मोठा होता. तो धोका पत्करण्याची वेलस्लीची तयारी नव्हती.

त्यामुळे त्याने जनरल लेकला यशवंतरावांवर शिस्तबद्ध चढाई करण्याची परवानगी दिली.
१६ एप्रिल १८०४ रोजी वेलस्लीने यशवंतराव होळकरांविरुद्ध युद्ध घोषित केले पण सुरुवात यशवंतरावांनी केली.

युद्ध सुरु

होळकर तयारीत होतेच. ते किंबहुना या क्षणाचीच वाट पहात होते. बुंदेलखंडात कुचजवळ कर्नल फोसेटचा आठ हजार सैन्याचा तळ होता. अमिरखान त्याच परिसरात होता. युद्ध त्यांनी घोषित केले असले तरी पहिला आघात यशवंतरावच केला. त्यांनी फोसेटच्या तळावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. आपल्या सोबत अमिरखान व पाच हजार पेंढारी घेवुन त्यांनी फोसेटच्या तळावर अचानक धाड घातली आणि त्याच्या जवळपास दोन बटालियनची भिषण कत्तल केली. फोसेट घाबरुन जो पळत सुटला तो बेटवालाच जावुन पोहोचला. त्याच्या अनेक तोफा आणि युद्धसामग्री या युद्धात यशवंतरावांच्या हाती लागली. ही लढाई २२ मे १८०४ रोजी झाली.

ही तर फक्त सलामी होती. इंग्रजांचे बलाढ्य लष्कर असेच पळत सुटनार होते...
इंग्रजांचे सुरुवातीलाच नाक कापले गेले होते.

Wednesday, April 23, 2014

हडपसरची लढाई

पेशव्याने शेवटच्या विनंतीलाही मान दिला नाही, चर्चेची तयारी दाखवली नाही यामुळे युद्ध अटळ झाले. शिंद्यांची व अन्य सरदारांची अजस्त्र फौज वानवडीजवळ जमा झालेली होतीच. यशवंतरावांनीही आपल्या सेनासागरासह हडपसर गाठले.

पेशव्यांच्या बाजुने सर्वाधिक भरणा अर्थातच शिंद्यांच्या सैन्याचा होता. जवळपास सव्वा लाखाचे घोडदळ व पायदळ आणि विलायती कंपु व जवळपास ८० तोफा शिंद्यांनी मैदानात उतरवल्या होत्या. त्याशिवाय त्यांनी भाडोत्री पेंढारी सैनिकही या युद्धात सामील करुन घेतले होते. पेशव्यांची रडतराव ६०००ची फौजही त्यांच्या दिमतीला होतीच.

होलकरांची बाजु अर्थात भक्कम होती. त्यांचे घोडदळ भारतातील सर्वोत्क्रुष्ठ मानले जात असे. होळकरांचे घोडदळ, पायदळ व तोफदळासहितचे एकुण सैन्य होते १४४०००. (सर जदुनाथ सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार. प्रत्यक्षात ते ८० ते ९० हजार एवढेच असावे असे अन्य काही साधने सुचवतात.) यशवंतरावांची सर्वात जमेची बाजु म्हणजे प्रत्येक सैनिकाचा, मग तो पठाण असो कि पेंढारी, हिंदु असो कि देशी मुसलमान, प्रत्येकाचा आपल्या सेनापतीवर पराकोटीचा विश्वास होता. प्रत्येक युद्ध शिपायाप्रमानेच त्यांचा सेनानी त्यांच्या खांद्याला खांदा लावुन लढला होता. त्यामुळे शिपाईगड्यांत असलेली मित्रत्वाची भावना निर्माण झालेली होती.

या उलट शिंदेंचे होते. स्वत: दौलतराव शिंदे अद्याप उत्तरेतच होते. होळकर दक्षीनेत गेल्याचा फायदा तो उत्तरेत बसुन घेत होता. स्वाभाविकच त्याच्या सैन्यात कितीसा जोर असणार?

२५ आक्टोंबर १८०२.

या युद्धाकडे सा-या हिंदुस्तानचे लक्ष लागुन राहिलेले होते. पेशव्यांच्या पुण्यावर निजामानंतर कोणीही स्वारी केल्याचे धाडस दाखवलेले नव्हते. दुर्बळ झाली असली तरी अजुन मराठेशाही पराक्रमी सरदारांमुळे जीवंत होती. येथे दोन बलाढ्य सरदार अस्तित्वाचा लढा लढणार होते.
युद्धाची व्युहरचना झाली होती. शिंद्यांच्या बाजुने (पश्चिम) कुल्ब अली खानच्या नेत्रुत्वाखालील अंबाजी इंगळेच्या सात बटालियन, क्यप्टन डेव्जच्या नेत्रुत्वाखालील सुदरल्यंडच्या चार बटालियन्स, डाव्या बाजुला सदाशिव भास्कर बक्षीच्या अधिपत्याखालील घोडदळ, आणि काही अंतरावर पेशव्याचे सैन्य आणि समोर तोफखान्याची रचना अशी स्थिती होती. या संपुर्ण सेनेचे सेनापत्य बक्षी करत होता.

होळकरांच्या उजव्या बाजुने मिरखानचे घोडदळ व पायदळ, कर्नल हार्डिंगच्या चार ब्रिगेड, विकर्सच्या पाच तर डोडच्या ३ बटालियन्स सज्ज होत्या तर डाव्या बाजुला शहामत खान, फत्तेसिंग माने, मिरखान, नागो शिवाजी शेणवी, भवानी शंकर खत्री (बक्षी)सारखे सेनानी आपापल्या दळाचे नेत्रुत्व करत होते. समोर तोफखाना होता. होळकरांकडे यासमयी जवळपास १०० तोफा होत्या.

स्वत: यशवंतराव घोड्यावर स्वार होवुन आपल्या हुजुरातीच्या कडव्या सैन्यासह उंचवट्याव समोर थांबले होते. तेथुन संपुर्ण रणभुमीचे त्यांना निरिक्षण करता येत होते.
सकाळी साडेनवाच्या आसपास शिंद्यांकडुन प्रथम तोफा धडादल्या. यशवंतरावांनी पुन्हा आदेश दिला, जोवर ते २५ वेळा तोफा डागत नाहीत तोवर आपण युद्ध सुरु करायचे नाही. त्यांनी आपल्या सैन्याची नाहक हानी होवु नये म्हणुन सैन्य जरा मागे सरकावले. शिंद्यांना वाटले शत्रु घाबरला...त्यांना अधिकच चेव चढला. जसे २५ बार होवुन गेले तसे यशवंतरावांनी इशारा केला आणि होळकरांची फौज त्वेषाने शिंदेंच्या सैन्यावर तुटुन पडली.

बाजीराव पेशवा पर्वतीवरुन भरल्या पोटाने (त्या दिवशी दिवाळीचा दिवस होता.) युद्धाचे द्रुष्य काही वेळ पहात होता. नंतर जय झाला कि पराजय याची विचारपुस न करता वा अंतिम निकालाची वाटही न पहाता जो निघाला तो सरळ डोणज्यालाच जावुन धडकला.
इकडे धमासान युद्ध सुरु होते. शिंदेंच्या डी बोईं आणि सदाशिव भास्करने फारच कडवी लढत दिली. रक्ताचे पाट वाहु लागले. मिर खान त्या गर्दीत सापडला...त्याचा घोडा पडला...पण तरीही लढतच राहिला. कर्नल हार्डिंग आपल्या बटालियनसह पुढे आला...मिर खानाला सुरक्षित केले आणि कुल्ब अलीच्या ब्रिगेडला हादरवुन सोडले.

याच वेळीस आतापर्यंत युद्द्धभुमीचे निरिक्षण करणारे यशवंतराव आपल्या कडव्या सैन्यासह युद्धभुमीवर उतरले. झंझावाती वेगाने ते शिंदेंच्या तोपचींवर कोसळले व अनेकांना कंठस्नान घातले. तोफखाना बंद पाडुन मागे असलेल्या कुल्ब अलीच्या घोडदळावर उतरले आणि धुमश्चक्री सुरु झाली. तोवर त्यांच्या हाताला मोठ्या चार जखमा झालेल्या होत्या. तरीही ते शत्रुला सपासप कापुन काढत होते. स्वत: यशवंतराव एवढ्या वीरस्रीने युद्धात उतरल्यानंतर सैन्याला अजुनच त्वेष चढला. काही क्षणांतच युद्धाचा रांगरंग पालटला. शिंदेंचे घोददळ पळत सुटले. पायदळ कसे बसे जीव वाचवायचा प्रयत्न करत मागे हटत राहिले. पेशव्यांची हुजुरात तर कधीच गायब झाली होती.

डी बोई आणि डेव्ज हेच काय ते शिंद्यांकडुन शेवटपर्यंत लढले. त्यांच्या १४०० पैकी ६०० लोक ठार झाले होते. शेवटी त्यांनीही माघार घेतली. चारपैकी ३ युरोपियन अधिकारी ठार झाले. होन्रो नामक एक फ्रेंच अधिकारी वाचला, पण त्याला नंतर वानवडीच्या शिंदेंच्या वाड्यात पकडण्यात आले. फत्तेसिंग मानेंनी पळत्या सैन्याचा पाठलाग करुन पुरती वाताहत केली.
या युद्धात शिंदेंचे ५००० सैनिक ठार झाले तर हजारो जखमी झाले.
यशवंतरावांचा या युद्धात पुर्ण विजय झाला होता.

पुण्याकडे पळालेल्या शिंदेंच्या सैन्याची तर अजुनच फटफजिती झाली. लोक त्यांना प्यायला पाणी देईनात तर खायला अन्न कोठुन? त्यांच्या तोंडावर लोक दारे बंद करत होते. रस्त्यावर कुत्र्यासारखे त्यांना सडावे लागले. एवढी घृणा लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल होती. अनेक वर्ष ते शिंद्यांचा अत्याचार सहन करत होते...आता त्यांना कोणीतरी त्राता भेटला होता...अन्यायाचे पर्व आता दूर होईल अशी आशा त्यांच्या मनात प्रज्वलीत झाली नसेल तरच नवल!

पण दिवाळीचा दिवस असुनही पुण्यात कोनाच्या घरात चुल पेटली नाही हेही खरे.
लोक घाबरलेले होते...

याचे खरे कारण होते खुद्द पेशवाच पळुन गेला आहे ही बातमी संध्याकाळपर्यंत पुण्यात वा-यासारखी पसरली होती...

अनिश्चिततेचे पुरेपुर सावट पुण्यावर पडले होते.

या युद्धातील विजयानंतर यशवंतरावांनी पुणे लुटायची आद्न्या द्यावी असे मीरखानाने सुचवले. यशवंतरावांनी त्याला मनाई तर केलीच पण सर्व सैन्य वानवडीतच थांबेल, कोणीही पुण्याकडे जानार नाही असा आदेशच काढला. "कोणीही पुण्याकडे गेला, एकाही नागरिकाची साधी कवडी जरी लुटली वा स्त्रीयांच्या अब्रुला हात घातला तर त्याचे हात-पाय तोडुन भर रस्त्यात फेकले जाईल..." असा तो कठोर आदेश होता. यशवंतरावांची शिस्त अत्यंत कडक आणि वचक फार मोठा होता. त्यामुळे त्याच्या सैन्याने, विशेशता: पेंढारी व पठाण सैन्याने, निमुटपणे तो हुकुम पाळला.
पेशवा कुंजीर व अन्य काही दरबा-यांसह पळुन डोनजे येथे थांबला आहे ही वार्ता यशवंतरावांनाही संध्याकाळपर्यंत मिळाली. ही घटना अनपेक्षीत होती. त्याला तातडीने मदत पाठवायचा व पुण्याला परत आणायचा निर्नय त्यांनी घेतला व रसदेसह एक तुकडी डोणज्याला पाठवली. पण तोवर स्वारी पुढे निघुन गेली होती. यशवंतराव आपल्याला पकडण्यासाठी वा ठार मारण्यासाठी सैन्य पाठवत आहे अशी भिती त्याला असावी. पण ते खरे नव्हतेच. पेशव्याकडे आता सैन्यच काय होते? मनात आनते तर यशवंतराव त्याला पठाणी तुकड्या पाठवुन खरोखर पकडुन आणु शकले असते. पुढे बाजीराव रायगडावर जावुन पोहोचला. तेथुन त्याने इंग्रजांशी बोलणी चालु ठेवली. त्याला नि:शंकपणे पुण्याला येण्याची अनेक आर्जवी निमंत्रणे यशवंतरावांनी पाठवली, पण बाजीरावाने ऐकले नाही.

Tuesday, April 22, 2014

विधवांचे युद्ध !


महादजी शिंदे हे शिंदे घराण्यातील मुत्सद्दी आणि शुर योद्धे होते. परंतु ते निपुत्रिक वारल्याने दौलतराव शिंदेंना (महादजींचा पुतन्या) वारस नेमण्यात आले होते. तेंव्हा दौलतरावाचे वय होते अवघे १५ वर्ष. पण दौलतरावाच्या स्वभावामुळे शिंदेंचे एकनिष्ट सेनानी, विशेषता: लखोबादादा लाड नाराज झाले होते. ते महादजी शिंदेंचे विश्वासु सेनानी व मुत्सद्दी होते. दौलतरावानेही आधी त्यांची आपला उत्तरेतील मुत्सद्दी प्रतिनिधी म्हणुन नेमणूक केली होती. दौलतरावाचे धरसोडीचे धोरण त्याला पसंत पडत नव्हते. त्यात महादजी शिंदेंच्या दोन विधवाही (लक्ष्मीबाई आणि यमुनाबाई) दौलतरावाला खरा वारस मानायला तयार नव्हत्या. या दोन्ही विधवांना पाठबळ मिळाले ते या महादजींशी इमानदार असलेल्या अशा असंतुष्ट सेनानीचे. त्यातुन बराच काळ एक युद्ध पेटले होते त्याला विधवांचे युद्ध म्हणुन ओळखले जाते. हे युद्ध खुद्द दौलतराव शिंदेंच्या विरुद्ध होते. अर्थात विधवांची सैन्यशक्ती कमी होती. लखोबादादाचाच काय तो त्यांना आधार उरला होता. आपल्या विधवा मातांना युद्ध करायला भाग पाडणारा हा दौलतराव महावीर!

शिंद्यांची राजधानी उज्जैन येथे होती हे सर्वांना माहितच आहे. त्यावेळी उज्जैनला शिंद्यांचे फारसे लष्कर नव्हते. या विधवांच्या युद्धायमान भुमिकेमुळे यशवंतरावांना आयतीच संधी चालुन आली. 
लखोबादादाने यशवंतरावांना स्वता:हुन मदतीचे आमंत्रण दिले ते उज्जैनी जिंकुन देण्यासाठी.

यशवंतरावांनी उज्जैनवर चढाई केली. सहज जिंकली. महादजींच्या विधवांच्या ताब्यात दिली (मे 1799) तेथील धनाढ्यांकडुन युद्धखर्च म्हणुन खंडणी वसुल करायला सुरुवात केली. दरम्यान ही बातमी दौलतरावांपर्यंत पोहोचली. यशवंतराव एवढा आक्रमक असेल याची त्याने कल्पना केली नव्हती. पण मग धुर्त दौलतरावाने लगोलग चाल खेळली. त्याने आपल्या दोन्ही विधवा मातांशी तहाची बोलणी सुरु केली. कायमचा तोडगा निघतो असे दिसताच लाखवादादाचा विचार बदलला आणि यशवंतरावांना उज्जैन सोडण्याची विनंती केली. यशवंतरावांनी ती विनंती मानली आणि खंडणी वसुली थांबवून तेथील बाळोबा (बाळाराव) इंगळे सरदाराकडुन नाममात्र खंडणी वसुल केली आणि आपला मोहरा कोटा आणि हाडा या राज्यांकडे वळवला. हे दोन्ही प्रांत त्यांनी कमालीच्या तडफेने जिंकले आणि तेथुन खंड्णी वसुल केली.

दौलतराव खरेच इरसालपणाचा एक नमुना होता. त्याने यशवंतरावांना शिंदे जागीरीतुन दुर करण्यासाठी खेळलेली ती चाल होती. दौलतरावाने आपल्या मातांना संरक्षण आणि खर्चाची सारी व्यवस्था करण्याचे वचन दिले. एवढेच नव्हे तर सर्जेराव घाटगे या दुष्ट सरदाराला पुन्हा आश्रय देनार नाही असेही कबुल केले...

लखोबादादा मात्र इमानदारीत आता महादजींच्या विधवांवरील आरिष्ट टळले या भ्रमात होता आणि दौलतरावांच्या आद्न्या पाळत थांबला होता. पण तसे व्हायचे नव्हते. ४ जानेवारी १८०० रोजी दौलतरावाने सर्जेरावाला पुन्हा आपल्या दरबारात स्थान दिले. सर्जेराव हा अत्यंत क्रुर इसम. १४ जानेवारीच्या मध्यरात्री त्याच्या भाडोत्री मारेक-यांनी दोन्ही विधवांच्या निवासात घुसुन त्यांचा खुन करण्याचा प्रयत्न केला. त्यात यमुनाबाई ही विधवा गंभीर जखमी झाली...पण आरड्याओरड्याने पहारेकरी सावध झाले व काही मारेक-यांना पकडले गेले. त्यांनी खरा कट सांगितल्यावर लाखवा दादा हादरला. आपला धनी एवढा नीच आहे याची त्याने कल्पनाही केलेली नव्हती. आपल्यालाही कधीही अटक होवू शकते आणि मातोश्रींचे येथे काही खरे नाही याची जाण त्याला आली. वरकरणी काहीही न दाखवता, शेवटी त्याने दोघींसहित सुरक्षित पलायन केले आणि सरळ बुर्हानपुर गाठले. दरम्यान उज्जैन पुन्हा दौलतरावाच्या ताब्यात गेले होते. विधवांचा नाईलाज झाला. तेथुन या दोन्ही महिलांनी यशवंतरावांना पत्र पाठवून आपल्याला उज्जैन पुन्हा मिळवुन देण्याची विनवणी केली.

या दररम्यान ब-याच घटना घडल्या होत्या. यशवंतरावांनी परत जिंकुन घेतलेल्या टोक व रामपुरा या जहागिरी जनरल पेरोंने पुन्हा ताब्यात घेवुन जयपुर राज्याला जोडुन टाकल्या होत्या. जनरल पेरों हा दौलतरावांचा उत्तरेतील सरसेनापती. त्याने आपले महाल पुन्हा ताब्ब्यात घेतल्याच्या व्रुत्तामुळे यशवंतराव अस्वस्थ होते. शिंदेंना एक जबरी झटका देणे भाग होते. त्यांनी अत्यंत मुत्सद्दीपणे प्रथम लक्ष्मीबाई व यमुनाबाई या दोन्ही विधवांना सन्मानपुर्वक महेश्वरला बोलावुन घेतले. त्यांना १ लाख रुपये रोख व एक लाख रुपयाची वस्त्रे-अलंकार दिले. यानंतर त्यांच्याशी करार केला. या करारानुसार यशवंतरावांनी त्यांना महादजी शिंद्यांची उत्तरेतील जहागीर परत मिलवुन द्यायची होती. यासाठी ज्या लढाया कराव्या लागतील त्या खर्चासाठी विधवांनी ४ लाख रुपये द्यायचे होते.

ज्या युद्धातुन यशवंतरावांना अंग काढुन घ्यावे लागले होते त्यात त्यांना पुन्हा उतरावे लागले.


या युद्धात यशवंतराव पडण्याचे साधे कारण म्हणजे त्यांना शिंद्यांचा जमेल त्या पद्धतीने पाडाव करुन होलकरी सत्तेचा उत्तरेत अंम्मल बसवायचा होता. महादजींच्या विधवांबद्दल त्याला सहानुभुती असण्याचे काहीच कारण नव्हते कारण होळकरी राज्यावर महादजी शिंदेंनी आक्रमण करुन होळकरांचा अपराध केलेला होताच. हे त्यांच्या द्रुष्टीने फक्त राजकारण होते आणि आपली सत्ता बळकट करण्याचे साधन.

यशवंतरावांनी लक्ष्मीबाई व यमुनाबाईंना उज्जैनला सुखरुप पोहोचवले. थोडक्या लढाईत उज्जैन पुन्हा ताब्यात आली. तेथे पोहोचल्यावर चार लाख देण्याचा वायदा होता. परंतु या दोघींनी ते पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतीलही कदाचित...पण लोक सहानुभुती देणार...पैसे कोठुन? आणि सैन्य पोटावर चालते. बरीच वाट बघुनही पैसे मिलत नाहीत हे पाहिल्यावर मात्र यशवंतरावांचा संयम सुटला. वाट पहात कालापव्यय करणे त्यांच्या स्वभावात नव्हते. अन्यत्र तरी स्वा-या करुन धन उभे करावे हा मनसुबा झाला. त्यांनी आपल्या कर्नल प्लमेट याची प्रशिक्षित बटालियन बोलावुन घेतली. हे कळताच त्या दोघींना वाटले कि यशवंतराव आपल्यालाच अटक करणार...पण तसे नव्हते. बटालियन बोलावण्यामागील हेतु शिंद्यांचे महाल जिंकण्यासाठीची आक्रमने हा होता. पैसे त्यातुनच उभे राहनार होते. उज्जैन लुटायचे नाही हे त्यांनी आधीच ठरवलेले होतेच. या दोन बायांना अटक करायला बटालियनची गरजच काय होती? तसे करायचे असते तर त्यांना ते पुर्वीच कधीही करता आले असते. किंवा त्यांची बाजु घेण्याचेही टाळता आले असते. पण त्या दोघी तेथुन चक्क पळुन गेल्या.

यामुळे यशवंतराव अधिकच संतापले. त्याने या दोघींना उज्जैन परत मिळवुन दिले होते. त्या बदल्यातला खर्च त्या देत नव्हत्या. आता त्या चक्क पळुन गेल्या होत्या. 


यशवंतरावांनी मग नाईलाजाने उज्जैनमधील धनाढ्यांवर ती खंडणी लादली. जे देत नव्हते त्यांच्या महालांत खनत्या लावण्यात आल्या. शिंद्यांचा प्रत्येक प्रदेश पायतळी तुडवायला सुरुवात झाली.

हे कळताच दौलतराव शिंद्यांनी पाच बटालियन्स उज्जैन व त्याच्या जहागिरीच्या रक्षणासाठी तातडीने पाठवल्या.

याच दर्म्यान दौलतरावाने पेशव्यांवर दबाव आणुन काशीरावाला होळकरी जहागिरीची वस्त्रे देण्यासाठी दबाव आणला.

उद्देश हा कि यशवंतरावांना उपरा ठरवता यावे व त्याच्याविरुद्ध जोरदार आघाडी उभारता यावी. त्याचवेळीस यशवंतरावांचा लाडका लहाणगा पुतन्या, दुस-या मल्हाररावांचा मुलगा याचा हक्क कायमचा हिरावता यावा.

पेशवा पुरता दौलतरावाच्या इच्छेपुढे काही करु शकत नव्हता. त्याने काशीराव होळकरांना वस्त्रे दिली. पण उत्तरेत याचा काहीएक पडसाद उमटला नाही. होळकरी प्रजा काशीरावाचे स्वामित्व मानण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

आणि कोण पेशवा? हा प्रश्न आता देशातील जनता विचारायला लागली होती एवढी पेशवेपदाची अवनती दुस-या बाजीरावाने करुन ठेवली होती.

दररम्यान होळकरांच्या उत्तरेतील सर्व प्रांतांना ताब्यात घेण्यासाठी यशवंतरावांना छोट्यामोट्या लढाया लढाव्या लागतच होत्या. त्यांनी विधवांच्या संघर्षातुन अंग काढुन घेतले होतेच. त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा झाला कि शिंदेंचा बटालियन्स लाखवादादाच्याच पाठलागात व्यस्त राहिल्या. लाखवादादा त्या बटालियन्सशी सरळ लढु शकत नव्हता म्हणुन त्याने गनीमी काव्याचा आधार घेतला, त्यामुळे शिंदेंचा जयही लांबत गेला. शिंद्यांतर्फे या बटालियन्सचे नेत्रुत्व करत होता जनरल पेरों हा फ्रेंच सेनानी. त्याला दौलतरावांनी त्यांचा उत्तरेतील मुख्य सेनापती म्हणुन नियुक्त केलेले होते. तो अत्यंत शुर व साहसी योद्धा होता. त्याने तीन्ही दिशांनी फास आवळत आनला होता. लाखवादादाला पळायला एकच दिशा उरली होती...पुर्व. तो मागे सरकला ते सेउंधाचा किल्ला गाठला. शेवटी सेउंधा येथे घनघोर युद्ध झाले. या युद्धात मात्र 
लखोबादादा लाड प्राणांतिक जखमी झाला. या युद्धात त्याने जी पराक्रमाची शर्थ केली त्याला तोड नाही. महादजींचा हा स्वामीभक्त सेनानी. त्याला तेथुन माघार घ्यावी लागली...पण त्याने स्वत: घायाळ असतांनाही पाठलाग चुकवत महादजींच्या विधवांना प्रथम सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. तो त्या जखमांतुन पुर्णपणे कधीच बरा होवु शकला नाही. शेवटी ७ फेब्रुवारी १८०३ रोजी या शिंदेशाहीतील शेवटच्या इमानी माणसाने शेवटचा श्वास सोडला. 

जीवनाला निर्वस्त्र भिडणारे ...!


मराठीत एके काळी उत्तमोत्तम इंग्रजी कादंब-या अनुवादित करण्याचे (आणि ढापण्याचेही) पेव फुटले होते. पाबळ (ता. शिरुर) येथील नेहरु वाचनालयात आणि धुळ्याच्या गरुड वाचनालयात मी अशा असंख्य कादंब-या वाचल्या. पण आज आठवतात अत्यंत मोजक्या. त्यातील एक म्हणजे "राक्षस" या नांवाने अनुवादित झालेली मुळ हर्मन मेल्व्हिल लिखित "मोबी डिक" ही कादंबरी. (याच कादंबरीचा मुलांसाठी साने गुरुजींनीही संक्षिप्त अनुवाद केला होता.) एका तरुण होतकरू खलाशाच्या नजरेतून लिहिली गेलेली ही कादंबरी. एका जहाजाचा कप्तान...एका निळ्या देवमाश्याने त्याचा पाय आणि त्याचा मुलगाही गिळलेला...सूडसंतप्त...काहीही करून त्या देवमाशाला शोधून त्याला ठार मारायचा प्रण केलेला...

कादंबरी संथ लयीत असली तरी एक शब्दही नजरेआड होऊ देत नाही. द्रुष्यात्मकता इतकी अचाट कि आजही "राक्षस" आठवली कि रोमांचित होतो. अनुवादकाचे मला नांव आठवत नाही...पण त्याचेही कसब पणाला लागलेले.  एकच शोध...निळा देवमासा शोधायचा आणि त्याचा खात्मा करायचा. या शोधात मानवी मनांतील अरण्ये आणि त्यातील प्रत्येक पात्राची सृष्ट-दुष्ट धाव....एक आंतरिक तर एक बाह्य तर कधी दोन्हीतही संघर्ष...

कोण यशस्वी होते या लढ्यात?

खरे तर कोणीही नाही. पण ही कादंबरी म्हणजे एकोणिसाव्या शतकातील एक सर्वोत्कृष्ठ मित्थकथा आहे. या कादंबरीलअ नोबेल मिळाले नाही...(चित्रपट मात्र निघाला तो मी पाहिलेला नाही) पण याच कादंबरीची भुतावळ अर्नेस्ट हेमिंग्वेंवर उतरली...आणि सिद्ध झाली एक अत्यंत छोटी पण महाकादंबरी....तिचे नांव "Old man & The Sea"! ही कादंबरी मोबी डिकची एकार्थाने प्यरोडी आहे. मोबी डिकचा अदृष्य पातळीवर वावरणारा तत्वज्ञानाचा जो गाभा आहे तोच पकडत हेमिंग्वेंनी एका पोराला आपल्या अजरामर जिद्दीचे दर्शन घडवण्यासाठी एक देवमासा मारायचा पराक्रम घडवत मृत देवमाशाला सांगाडा म्हणून का होईना, किनारी आणेपर्यंतचा  एका जर्जर वृद्धाचा संघर्ष टिपला. मानवी जिद्दीचे, अपयशांतीलही भव्यतेचे तत्वज्ञानात्मक अजरामर दर्शन घडवले. मेल्व्हिल काय...हेमिंग्वे काय...जीवनाला निर्वस्त्र भिडणारे साहित्यिक. 

पु.लं. नी "एका कोळियाने" नांवाने हेमिंग्वेचा अनुवाद कधीतरी साठ-पासठच्या दरम्यान नितांतसुंदर केला होता...ती आवृत्ती ९५-९६ सालापर्यंत तरी संपलेली नव्हती. "राक्षस" ची आवृत्ती परत काढावी असा माझा मानस होता...तोवर पाबळचे नेहरू वाच्नालय कोठे गेले याचा पत्ता लागला नाही...अन्यत्र शोधायचा प्रयत्न केला...यश आले नाही.

पण मला नेहमीच प्रश्न पडे...आमचे कोळी अशाच वेगळ्या प्रकारच्या का होईना जीवनानुभवांतून जात असतील. त्यांनी लिहिले असते तर? मी माझे (आता दिवंगत) मित्र प्रशांत पोखरकरांना कोकणात मासेमार वस्तीवर दोन-चार महिने, त्यांच्यासोबत मच्छीमार नौकांवर जात त्या अनुभ्वांतून, दंतकथांतून कादंबरी लिहायचा प्रस्ताव ठेवला होता. (अजुनही एक होता...पण त्याबद्दल नंतर...) अनिल जोशी या माझ्या रत्नागिरीतील पत्रकार मित्राने पोखरकरांसाठी मच्छीमारांच्या योग्य वस्त्या शोधल्याही होत्या...पण दुर्दैवाने पोखरकरांचा अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. राहिले ते राहिलेच! 

असो. "गतं न शोच्यं" असे म्हणतात. आजही मराठी किना-यांच्या थरारक कथा येवू शकतात...जीवनाचे सागरव्यापी रूप घेत!

Sunday, April 20, 2014

रिसडी....

कंदिलाला वात नसायची आणि चिमणीत रोकेल नसायचे...अशा भुताळ अंधारात आई रिसडीची गोष्ट सांगायची. रिसडी म्हणजे अस्वलीन. तर काय असते, ही रिसडी डोंगरवाटेवरुन चुकला-माकला प्रवासी आला तर त्याला ठार मारुन त्याची दौलत लुटायची आणि आपली डोंगरकपारीतील गुहा सजवायची.

अशाच वाटेवरुन एक साम्राज्य हरपलेला दुर्दैवी राजकुमार जात असतो. रिसडी त्याला लुटायचा प्रयत्न करते...पण काय? त्याच्याकडे काहीच नाही..फक्त रूप...

रिसडी त्याच्या रुपावर मोहित होते...त्याला आपल्या गुहेत नेते...त्याच्यावरील अभंग प्रीत व्यक्त करते...राजकुमार पळून जायचे जेवढेही प्रयत्न करतो ते ती हाणूनही पाडते...

हतबल राजकुमार शेवटी तिच्या इच्छेचा बळी होतो.

पण तो खूश नाही...

वर्षामागून वर्ष जातात...रिसडीला बाळेही होतात...पण राजकुमार खूश नाही...

ती त्याला विचारते...

"का रे? मी तुझ्यावर अनंत प्रेम करतेय...पण तू का उदास आहेस?"

खूपदा प्रश्नाचे उत्तर टाळलेला राजकुमार एकदाचा म्हणतो..."माझे त्या डोंगरापारच्या आदिवासी राजकन्येवर प्रेम होते...मी तिलाच भेटायला चाललो होतो...पण तू मला बळकावलेस...आता मला माहित नाही...कशी असेल माझी प्रिया...मला तिला भेटावेसे वाटतेय..."

रिसडी दयाद्र होते. कळवळते...पण म्हणते, "तुला खरेच जायचे आहे लाडक्या?"

त्याचा होकार त्याच्या निश्वासातून मिळाला.

"ठीक आहे...जा तू!"

रिसडी त्याला सोडायला रस्त्यावर आली. राजकुमार मागे न पाहता झपाझप त्याच्या इप्सिताकडे चालू लागला. तो शेवटपर्यंत दिसावा यासाठी रिसडी झाडावर चढू लागली. तो जसजसा दूर जात होता तसतशी रिसडी झाडावर उंच चढत होती....

तो वळतच होता त्या वळनावर...

रिसडी झाडाच्या टोकावर...

तो अदृष्य झाला...

ती झाडावरून कोसळली....

एक गोष्ट!

लहानपणी आईने सांगितलेली एक गोष्ट. आटपाट नगर होतं. त्या नगराबाहेर झोपडपट्टीत एक भिकारी रहायचा. दैन्यावस्थेने पार कावला होता तो. पण करणार काय? रोज नगरात जायचं आणि म्निळेल त्या भिकेत छोटा संसार चालवायचा. एके रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात चक्क देव आला. देव म्हणाला, "उद्याचा दिवस तुझे भाग्य बदलून टाकेल..." गडी खूष झाला. सकाळी उठल्या उठल्या बायकोला स्वप्न सांगितलं. बायकोनं त्याला वेड्यात काढलं..."असं कधी होतंय होय? निघा आपले गुमान झोळी घेऊन..."
भिका-याला मात्र आज आपलं कोटकल्याण होणार यावर विश्वास होता. पण कसं? भिकच...पण समजा राजानेच दिली तर? सोन्या-नाण्यांनी ही झोळी भरली तर? विचारानेच गडी हरखला. आज सरळ त्याने राजरस्ताच गाठला. राजा सायंकाळी देवदर्शन करून याच रस्त्याने परत येतो...
राजरस्त्यावर मोक्याची जागा पाहून भिकारी थांबला. जाणारे-येणारे धान्य नाहीतर एखाददुसरे तांब्याचे नाणे देत होते. पण त्याचे कोणाचकडे लक्ष नव्हते. राजा येण्याचीच तो वाट पहात होता. दिवस कलला. सावल्या लांबलचक झाल्या.
आणि राजाचा रथ दिसू लागला. भिकारी हरखला. जरा पुढे सरकला. राजाला आपण दिसायला हवं. आणि चक्क रथ थांबला कि त्याच्या पुढ्यात...आणि राजा खाली उतरला...त्याच्याच दिशेने येवू लागला...
भिका-याचं हृदय त्याच्या तोंडात आलेले...
त्याने झोळी पुढे सरसावली...
राजा आला. त्याच्या पुढ्यात गुढगे टेकून बसला...अत्यंत नम्रतेने म्हणाला...
"मला तुझ्याकडून दान हवे आहे..."
भिकारी किंचित मागे सरला. राजाकडे त्याने अत्यंत उपहासाने पाहिले...
"अरे राजा, तू मला दान द्यायचे तर माझ्याकडेच भिक मागतोस?"
"होय महाराज," राजा म्हणाला, "मला भिक द्या आणि कृतार्थ करा..."
भिका-याला काय करावे हेच सुचेना. संतापाने तो वेडापिसा झाला होता. पण समोर राजा तेवढ्याच लीनतेने बसलेला...
भिका-याने झोळीत हात घातला...धान्याचा एक दाना काढला आणि राजाच्या हातावर ठेवला...
"तू खरा भिकारी...जा आता...देव-बिव सगळे झूठ..."
राजाने नम्रतेने तो दाणा कपाळाला लावला, कशात ठेवला आणि भिका-याला अभिवादन करून रथाकडे गेला.
भिकारी संतापला होता. आता थांबायची कसलीही गरज वाटत नव्हती. तो तसाच घरी निघाला. देवाला शिव्या घालत.
घरी गेला. बायकोने चेष्टेने विचारले..."भेटला काहो देव?"
"नाहीच तो काय भेटनार? चल...बघ थोडे धान्य आणि काही नाणी आहेत...घे स्वयंपाक करायला..."
भिका-याने झोळी बायकोच्या हातात दिली. तिने ती नेहमीप्रमाणे उलटी केली. धान्य आणि नाणी...
पण एक चमकदार धान्याच्या दाण्याएवढाच कण...जेवढा राजाला दिला होता त्या दाण्याएवढाच कण...लखलखता...सोण्यासारखाच...नव्हे सोण्याचाच...त्याने वारंवार खात्री करून घेतली...
मग भकासपणे बायकोकडे पहात राहिला!

माणूस धन्य आहे...!

कालमूलमिदं सर्वजगद्बीजं धनंजय
काल एव समादत्ते पुनरेव यदृच्छया
स एव बलवान भूत्वा पुनर्भवति दुर्बल:

(काळ हे सर्व जागतिक घटनांचे आणि विश्वसंहाराचे बीज आहे. काळच आपल्या शक्तीने हे विश्व खाऊन टाकतो. काळ हा कधी बलवान तर कधी दुर्बल होतो.- व्यास, महाभारत)

आणि पुढे व्यास महाभारताचा शेवट करतांना म्हणतात-

उर्ध्वबाहुविरोन्मैश्य नकश्चित शृणोति माम?....

"मी दोन्ही बाहू उभारून आक्रोश करतो आहे...तुम्ही माझे ऐकत का नाही? अरे असेच कर्म करा कि ज्यामुळे मानवधर्म आणि मानवी मोक्ष शाश्वत राहील...."

आज काळ दुर्बळ आहे असे वाटावे अशी स्थिती आहे. मानवधर्माला आम्ही तिलांजली देत आहोत. सर्वार्थाने आम्ही या पृथ्वीचा आणि त्यावर जगणा-या यच्चयावत सृष्टीचा "काळ" बनलो आहोत.

आणि आम्हाला त्याची जराही शरम नाही. हव्यासाचा, द्वेषाचा, हिंसेचा उन्माद चौदिशांनी उसळतो आहे कानांचे दडे फाटवत....

इस्खिलूस "अगमेम्नन" या शोकांतिकेत दोन-अडिच हजार वर्षांपुर्वी लिहितो..."रक्त नेहमी रक्ताचीच मागणी करते...द्वेषातून द्वेषच भडकतो..."

हजारो वर्षांच्या रक्तपिपासू इतिहासापासून आम्ही काहीच शिकलो नाही...
आम्ही यत्किंचितही माणूस झालो नाही!

आम्ही खरे तर झापडे बांधून ठेवली आणि विचारवंतांना आदराच्या पिंज-यात कायमचे बंद करून टाकले. आम्ही मानवतेची महान दृष्य पाहिली...टाळ्या वाजवल्या...जरा भारावूनही गेलो आणि परत टाळ्या वाजवणारे तेच हात शस्त्रांकडे वळाले...वैचारिक अस्त्रे परजु लागले.

संस्कृतीचा अंत होत आहे यची ओरड स्वत:वरच शस्त्रे कोसळू लागतात तेंव्हाच मानवता-माणुसकी वगैरे आठवू लागली...

जोवर घाव दुस-यांवर होते तेंव्हा मात्र त्या अश्रुंत आणि वाहणा-या रक्तात आम्हीच उत्सव साजरे करण्यात कधी कुचराई नाही केली.

माणूस धन्य आहे...
कारण स्वत:चाच विनाश करवून घेण्यात त्याचा हात कोणी धरणार नाही!

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...